४९. श्री तात्यांचे सत्कर्म
श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांनी आपल्या जीवनामध्ये अनेक सत्कर्मे केली. मंदिरे बांधली, मूर्तींची स्थापना केली, समाजाला सन्मार्गाचे धडे शिकवले आणि लोकांना व्यसनांपासून परावृत्त केले.
ठिकठिकाणी सप्ताह आयोजित करून त्यांनी बहुसंख्य लोकांना भगवद्भक्तीस लावले. आपल्या मठात भागवत, रामायण, महाभारत आदी धर्मग्रंथांचे वाचन व श्रवण विधिवत केले.
गर्व, अहंकार, दुष्टता यांचा त्याग करून त्यांनी मन, वाणी व शरीरावर नियंत्रण ठेवले. नित्य गायत्री मंत्राचा १२-शे जप, सूर्यनमस्कार आणि श्री दत्तात्रेयांची पूजा करत त्यांनी आपली दृढ उपासना चालू ठेवली.
५०. योग आला पण क्षेम झाला नाही !
श्री समर्थ तात्यांनी आपल्या दत्तक घेतलेल्या शिष्याला सर्व पैसा स्वाधीन केला. परंतु, त्या पैशाचा योग्य वापर न करता तो शिष्य आसुरी वृत्तीने वागू लागला.
संतसंगती मिळणे दुर्लभ असते आणि ती टिकणे त्याहून दुर्लभ! शिष्याला तात्यांच्या संगतीचा योग तर आला, परंतु मन सांभाळून मर्जी संपादन करता आली नाही; यालाच 'योग आला पण क्षेम झाला नाही' असे म्हणतात.
संपत्तीच्या मदामुळे आणि वाईट संगतीमुळे त्याच्या हातून धर्मशास्त्र व नीतीविरुद्ध अनेक गैरकृत्ये घडून त्याची चुकीची वर्तणूक उघड झाली.
५१. विरोध वाढला
शिष्याच्या दुराचारामुळे विराळचे सर्व लोक त्याच्या विरोधात गेले. तारुण्यातील विषय-वासनांना बळी पडल्यामुळे त्याच्यावर कोर्टात कारवाया झाल्या. शेवटी तो शिष्य भीतीने पळून गेला व लपून राहिला, ज्याचा पत्ता पुढे लागलाच नाही.
परंतु, तो शिष्य पळून गेल्यानंतरही विराळचे काही लोक तात्यांचा द्वेष-मत्सर करू लागले आणि तात्यांनाच अपशब्द बोलून विरोध वाढवू लागले.
५२. श्री तात्यांची उदासीनता
शिष्याच्या दुराचरणामुळे तात्यांना दुःख झाले आणि ते अत्यंत उदास झाले. त्यांना संत तुकाराम महाराजांच्या प्रसिद्ध अभंगाची आठवण होऊ लागली:
“मेघवृष्टीने करावा उपदेश । परी गुरुने न करावा शिष्य ।
वाटा लाभे त्यास । केल्या अर्ध कर्माचा ।।१।।
द्रव्य वेचावे अन्न छत्री । भूती द्यावे सर्वत्र ।
न घ्यावा हा पुत्र । उत्तम याती पोसणा ।।२।।
बीज न पेरावे खडकी । ओल नाही ज्याचे बुडखी ।
थिता ठके शेखी । पाठी लागे दिवाण ।।३।।
गुज बोलावे संतासी । पत्नी राखावी जैसी दासी ।
लाड देता तियेसी । वाटा पावे कर्माचा ।।४।।
शुद्ध कसूनि पाहावे । वरिल्या रंगा न भुलावे ।
तुका म्हणे घ्यावे । ज्या नये तुटी ते ।।५।।” – संत तुकाराम महाराज
संत तुकाराम महाराज या अभंगातून बोध देतात की, कसल्याही परीक्षेविना कोणालाही दत्तक घेऊ नये किंवा शिष्य करू नये. लोकांचे अपशब्द ऐकून तात्यांचे मन खिन्न झाले.
५३. दत्तजयंतीस प्रतिबंध
दरवर्षी तात्या मठात दत्तजयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करत असत. त्यावर्षीही त्यांनी डोंगरशेळकीसह इतर गावांतील भजनी मंडळींना बोलावले होते.
परंतु शिष्याच्या प्रकरणावरून विराळच्या काही दुष्ट लोकांनी उत्सवाला विरोध करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर मठात सोहळा चालू असताना तात्यांच्या शेतात गुरे-डोरे मोकाट सोडून पिकाचे मोठे नुकसान केले व तात्यांना वेडेवाकडे शब्द बोलू लागले.
संतांच्या क्षमा, दया व शांती या गुणांची परीक्षा अशा दुष्ट लोकांमुळेच होते. विराळच्या लोकांनी छळ केल्यामुळेच तात्यांनी विराळचा परित्याग केला आणि ते डोंगरशेळकीस आले.
५४. श्री तात्यांची त्यागी वृत्ती
विराळच्या लोकांनी त्रास दिला तरी अत्यंत सहनशील असलेले तात्या शांतच राहिले. त्यांनी विराळचा मठ, मंदिर, संपत्ती आणि त्या लोकांचा संबंध कायमचा सोडण्याचा दृढ निर्णय घेतला.
स्वतःच्या कष्टाने शून्यातून उभारलेला दोन मजली भव्य दगडी मठ आणि स्वतः बांधून ठेवलेले समाधिस्थान—या सर्वांचा तात्यांनी एका क्षणात त्याग केला.
ज्याप्रमाणे कमळ पाण्यात राहूनही पाण्यापासून अलिप्त असते, त्याचप्रमाणे समर्थ तात्यांनी जराही आसक्ती न ठेवता विराळच्या मठाचा त्याग केला. केवढी ही अलौकिक त्यागी वृत्ती!