अर्जुन उवाच: ज्यायसी चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन । |
तत् किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव ॥ १ ॥
अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, जर कर्मापेक्षा ज्ञानमार्गच श्रेष्ठ आहे असे तुमचे मत असेल, तर हे केशवा, तुम्ही मला या घोर युद्धकर्मामध्ये का प्रवृत्त करत आहात?
मग आइका अर्जुनें म्हणितलें । देवा तुम्हीं जें वाक्य बोलिले ।
तें निकें म्यां परिसलें । कमळापती ॥ १ ॥
मग अर्जुन म्हणाला, हे कमळापती श्रीकृष्णा, तुम्ही जे काही बोललात ते मी नीट ऐकले आहे.
तेथ कर्म आणि कर्ता । उरेचिना पाहतां ।
ऐसें मत तुझें अनंता । निश्चित जरी ॥ २ ॥
हे अनंता, जर कर्माचा आणि कर्त्याचा विचार केला असता ते दोन्ही उरतच नाहीत, असे जर तुमचे निश्चित मत असेल,
तरी मातें केवी हरी । म्हणसी पार्था संग्रामु करीं ।
इये लाजसीना महाघोरीं । कर्मीं सुता ॥ ३ ॥
तर मग हे हरी, तुम्ही मला 'हे पार्था, तू युद्ध कर' असे कसे सांगता? आणि अशा या महाभयंकर युद्धकर्मात मला ढकलताना तुम्हाला काहीच वाटत नाही का?
हां गा कर्म तूंचि अशेष । निराकारासी निःशेष ।
तरी मजकरवीं हें हिंसक । कां करविसी तूं ॥ ४ ॥
अहो देवा, जर सर्व कर्मे नाहीशी करून निराकार आत्म्याशी एकरूप होणे हाच तुमचा खरा अभिप्राय असेल, तर माझ्याकडून हे हिंसक युद्ध आपण का करून घेत आहात?
तरीं हेंचि विचारीं हृषीकेशा । तूं मानु देसी कर्मलेशा ।
आणि येसणी हे हिंसा । करवित अहासी ॥ ५ ॥
तर हे हृषीकेशा, तुम्ही कर्माचा एवढा तिरस्कार करता आणि तरीही माझ्याकडून एवढी मोठी हिंसा करून घेत आहात, याचा तुम्हीच विचार करा.
व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे ।
तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम् ॥ २ ॥
तुमच्या या संमिश्र आणि संदिग्ध बोलण्यामुळे माझी बुद्धी गोंधळून गेली आहे. त्यामुळे ज्याने माझे निश्चित कल्याण होईल, असे कोणतेतरी एकच साधन मला सांगा.
देवा तुवांचि ऐसें बोलावें । तरी आम्हीं नेणतीं काय करावें ।
आता संपले म्हणे पां आघवें । विवेकाचे ॥ ६ ॥
हे देवा, जर तुम्हीच असे संभ्रमात टाकणारे बोलू लागलात, तर आमच्यासारख्या अजाण लोकांनी काय करावे? आता आमच्या सर्व विवेकाचा अंतच झाला असे म्हणावे लागेल.
हां गा उपदेशु जरी ऐसा । तरी अपभ्रंशु तो कैसा ।
आतां पुरला आम्हां धिंवसा । आत्मबोधाचा ॥ ७ ॥
अहो, जर तुमचा खरा उपदेश असा संभ्रमात पाडणारा असेल, तर मग भटकावणारा उपदेश कसा असतो? आता आमची आत्मज्ञानाची इच्छा पुरेपूर भागली!
वैद्यु पथ्य वारूनि जाये । मग जरी आपणचि विष सुये ।
तरी रोगिया कैसेनि जिये । सांगे मज ॥ ८ ॥
वैद्याने रोग्याला पथ्य सांगावे आणि नंतर स्वतःच त्याला विष द्यावे, तर मग तो रोगी कसा जगेल, हे मला सांगा.
जैसे आंधळे सुईजे आव्हांटा । कां माजवण दीजे मर्कटा ।
तैसा उपदेशु हा गोमटा । वोढवला आम्हां ॥ ९ ॥
जसे एखाद्या आंधळ्याला आडवाटेला न्यावे किंवा माकडाला मद्य पाजावे, तसाच हा तुमचा सुंदर उपदेश आमच्या वाट्याला आला आहे.
मी आधींचि कांही नेणें । वरी कवळिलों मोहें येणें ।
कृष्णा विवेकु या कारणें । पुसिला तुज ॥ १० ॥
मी आधीच काही जाणत नाही आणि त्यात या मोहाने मला ग्रासले आहे; हे कृष्णा, म्हणूनच मी तुम्हाला विवेक विचारला होता.
तंव तुझी एकेकी नवाई । एथ उपदेशामाजीं गांवाई ।
तरी अनुसरलिया काई । ऐसें कीजे ॥ ११ ॥
परंतु तुमची ही वेगळीच नवलाई आहे, या उपदेशामध्ये तुम्हीही अशा गमती करत आहात! आम्ही तुम्हाला शरण आलो, तर काय तुम्ही आमच्याशी असे वागावे?
आम्हीं तनुमनुजीवें । तुझिया बोला वोटंगावें ।
आणि तुवांचि ऐसें करावें । तरी सरलें म्हणे ॥ १२ ॥
आम्ही संपूर्ण शरीर, मन आणि जीवाभावाने तुमच्या शब्दांचा आधार घ्यावा आणि तुम्हीच जर आमच्याशी असे वागू लागलात, तर आता सगळे संपलेच म्हणावे लागेल.
आतां ऐसियापरी बोधिसी । तरी निकें आम्हां करिसी ।
एथ ज्ञानाची आस कायसी । अर्जुन म्हणे ॥ १३ ॥
अर्जुन म्हणाला, जर तुम्ही मला अशा प्रकारे शिकवणार असाल, तर तुम्ही माझे नक्कीच भले कराल! अशा स्थितीत मला ज्ञानाची काय आशा उरणार?
तरी ये जाणिवेचे कीर सरलें । परी आणिक एक असें जाहलें ।
जें थितें हें डहुळलें । मानस माझें ॥ १४ ॥
आता ज्ञानाची गोष्ट तर बाजूलाच राहिली, पण दुसरे असे झाले आहे की, माझे जे थोडेफार शांत असलेले मन होते, तेही यामुळे पूर्णपणे ढवळून निघाले आहे.
तेवींचि कृष्णा हें तुझें । चरित्र कांहीं नेणिजे ।
जरी चित्त पाहसी माझें । येणे मिषें ॥ १५ ॥
तसेच हे कृष्णा, तुमचे चरित्र काही कळत नाही. या निमित्ताने तुम्ही माझ्या मनाची परीक्षा तर घेत नाही ना?
ना तरी झकवितु आहासी मातें । की तत्वचि कथिलें ध्वनितें ।
हे अवगमतां निरुतें । जाणवेना ॥ १६ ॥
किंवा तुम्ही मला केवळ खेळवत आहात की मला गुप्तपणे खरे तत्त्वज्ञानच सांगत आहात, हे विचार करूनही मला नीटसे समजत नाही.
म्हणोनि आइकें देवा । हा भावार्थु आतां न बोलावा ।
मज विवेकु सांगावा । मर्हाटा जी ॥ १७ ॥
म्हणूनच देवा, माझे ऐका. आता हा असा गूढ अभिप्राय बोलू नका; मला अगदी स्पष्ट आणि सोप्या भाषेत विवेक सांगा.
मी अत्यंत जड असें । परी ऐसाही निकें परियसें ।
कृष्णा बोलावें तुवां तैसें । एकनिष्ठ ॥ १८ ॥
मी जरी अत्यंत अजाण असलो, तरी मला चांगल्या प्रकारे समजेल अशा स्पष्ट आणि निश्चित शब्दांत आपण बोलावे.
देखें रोगातें जिणावें । औषध तरी द्यावें ।
परी तें अतिरुच्य व्हावें । मधुर जैसें ॥ १९ ॥
रोगाचे निवारण करण्यासाठी औषध तर दिले पाहिजे, परंतु ते घेताना जिभेला अत्यंत चवदार आणि गोड वाटावे,
तैसें सकळार्थभरित । तत्व सांगावे उचित ।
परी बोधे माझें चित्त । जयापरी ॥ २० ॥
त्याप्रमाणे सर्व अर्थांनी परिपूर्ण असलेले योग्य तत्त्वज्ञान मला सांगावे, पण ते असे असावे की ज्यामुळे माझे चित्त सहजपणे ते ग्रहण करू शकेल.
देवा तुज ऐसा निजगुरु । आणि आर्तीधणी कां न करूं ।
एथ भीड कवणाची धरूं । तूं माय आमुची ॥ २१ ॥
हे देवा, तुमच्यासारखा स्वतःचा सद्गुरू लाभल्यावर मी माझी इच्छा पूर्ण का करून घेऊ नये? येथे मी कोणाची संकोच बाळगू? कारण तुम्हीच आमची आई आहात.
हां गा कामधेनूचें दुभतें । देवें जाहलें जरी आपैतें ।
तरी कामनेची कां तेथें । वानी कीजे ॥ २२ ॥
अहो, जर कामधेनूचे दूध सहजपणे प्राप्त झाले असेल, तर तेथे आपल्या इच्छेची कमतरता का ठेवावी?
जरी चिंतामणि हातां चढे । तरी वांछेचे कवण सांकडे ।
कां आपुलेनि सुरवाडें । इच्छावें ना ॥ २३ ॥
जर चिंतामणी हातामध्ये सापडला, तर इच्छेची कोणती अडचण उरणार? मग आपण आपल्या आवडीनुसार सर्व गोष्टींची इच्छा का करू नये?
देखें अमृतसिंधूतें ठाकावें । मग तहाना जरी फुटावें ।
मग सायासु कां करावे । मागील ते ॥ २४ ॥
जर आपण अमृतसमुद्रापाशी पोहोचलो आणि तरीही तहानेने व्याकूळ व्हावे लागले, तर मग आधी केलेले सर्व कष्ट व्यर्थच गेले ना?
तैसा जन्मांतरी बहुतीं । उपासिता लक्ष्मीपती ।
तूं दैवें आजि हातीं । जाहलासी जरी ॥ २५ ॥
त्याप्रमाणे अनेक जन्मांच्या उपासनेनंतर, हे लक्ष्मीपती, तुम्ही आज माझ्या नशिबाने मला प्राप्त झाला आहात,
तरी आपुलेया सवेसा । कां न मगावासी परेशा ।
देवा सुकाळु हा मानसा । पाहला असे ॥ २६ ॥
तर मग, हे परेश्वरा, मी माझ्या आवडीनुसार तुमच्याकडे का मागू नये? देवा, माझ्या मनाचा हा सुवर्णकाळ आज उजाडला आहे.
देखें सकळार्तीचें जियालें । आजि पुण्य यशासि आलें ।
हे मनोरथ जहाले । विजयी माझे ॥ २७ ॥
माझ्या सर्व इच्छा आज पूर्ण झाल्या आहेत आणि माझे पुण्य आज फळाला आले आहे; माझे सर्व मनोरथ आज यशस्वी झाले आहेत.
जी जी परममंगळधामा । देवदेवोत्तमा ।
तूं स्वाधीन आजि आम्हां । म्हणऊनियां ॥ २८ ॥
हे परम मंगलधामा, देवाधिदेवा, तुम्ही आज पूर्णपणे आमच्या स्वाधीन आहात, म्हणूनच मी हे बोलत आहे.
जैसां मातेचां ठायीं । अपत्या अनवसरु नाहीं ।
स्तन्यालागूनि पाहीं । जियापरी ॥ २९ ॥
ज्याप्रमाणे लहान मुलाला मातेच्या दुधासाठी आईकडे जाण्यास वेळेचे कोणतेही बंधन नसते,
तैसें देवा तूंते । पुसिजतसें आवडे तें ।
आपुलेनि आर्तें । कृपानिधि ॥ ३० ॥
त्याचप्रमाणे, हे कृपानिधी देवा, मी माझ्या मनातील इच्छेने आणि प्रेमाने तुम्हाला हवे ते विचारत आहे.
तरी पारत्रिकीं हित । आणि आचरितां तरी उचित ।
ते सांगें एक निश्चित । पार्थु म्हणे ॥ ३१ ॥
म्हणून अर्जुन म्हणाला, ज्यामुळे माझे परलोकात कल्याण होईल आणि जे मला आचरण करण्यासही सोपे व योग्य ठरेल, असे कोणतेतरी एकच निश्चित साधन मला सांगा.
श्रीभगवानुवाच: लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयाऽनघ ।
ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां ॥ ३ ॥
श्रीभगवान म्हणाले, हे निष्पाप अर्जुना, या लोकात आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेण्याच्या दोन प्रकारच्या निष्ठा (मार्ग) मी पूर्वीच सांगितल्या आहेत; एक सांख्यवाद्यांचा ज्ञानयोग आणि दुसरा कर्मयोग्यांचा कर्मयोग.
या बोला अच्युतु । म्हणतसे विस्मितु ।
अर्जुना हा ध्वनितु । अभिप्रावो ॥ ३२ ॥
अर्जुनाच्या या बोलण्यावर अच्युत श्रीकृष्ण आश्चर्यचकित होऊन म्हणाले, हे अर्जुना, हा माझा गुप्त आणि खोलवरचा अभिप्राय आहे.
जे बुद्धियोगु सांगतां । सांख्यमतसंस्था ।
प्रकटिली स्वभावता । प्रसंगे आम्हीं ॥ ३३ ॥
कारण तुला बुद्धियोग सांगत असताना, प्रसंगोपात आमच्याकडून स्वाभाविकपणे सांख्यमताची मांडणी प्रकट झाली.
तो उद्देशु तूं नेणसी । म्हणोनि क्षोभलासि वायांचि ।
तरी आता जाण म्यांचि । उक्त दोन्ही ॥ ३४ ॥
तो मूळ उद्देश तुला समजला नाही आणि म्हणूनच तू उगाचच संतापला आहेस. तर आता हे जाणून घे की, ते दोन्ही मार्ग मीच सांगितले आहेत.
अवधारीं वीरश्रेष्ठा । यें लोकीं या दोन्ही निष्ठा ।
मजचिपासूनि प्रगटा । अनादिसिद्धा ॥ ३५ ॥
हे वीरश्रेष्ठा ऐक, या जगातील या दोन्ही निष्ठा अना काळापासून सिद्ध असून त्या माझ्यापासूनच प्रकट झाल्या आहेत.
एकु ज्ञानयोगु म्हणिजे । जो सांख्यीं अनुष्ठीजे ।
जेथ ओळखीसवें पाविजे । तद्रूपता ॥ ३६ ॥
त्यातील एकाला ज्ञानयोग म्हणतात, ज्याचे आचरण सांख्य विचारवंत करतात; ज्या मार्गात आत्मज्ञानाची ओळख होताच तत्काळ परमात्म्याशी एकरूपता प्राप्त होते.
एक कर्मयोगु जाण । जेथ साधकजन निपुण ।
होवूनिया निर्वाण । पावती वेळे ॥ ३७ ॥
आणि दुसरा कर्मयोग आहे, ज्यामध्ये साधक लोक कुशलतेने कर्मे करत योग्य वेळी मोक्षाला प्राप्त होतात.
हे मार्गु तरी दोनी । परि एकवटती निदानीं ।
जैसे सिद्धसाध्यभोजनीं । तृप्ति एकी ॥ ३८ ॥
हे मार्ग जरी दोन दिसत असले, तरी शेवटी ते एकाच ठिकाणी एकत्र येतात; जसे तयार अन्नाने जेवले काय किंवा स्वतः बनवून जेवले काय, शेवटी मिळणारी तृप्ती एकच असते.
कां पूर्वापर सरिता । भिन्ना दिसती पाहतां ।
मग सिंधूमिळणीं ऐक्यता । पावती शेखीं ॥ ३९ ॥
किंवा पूर्व व पश्चिम दिशेकडून वाहणाऱ्या नद्या पाहताना वेगवेगळ्या दिसतात, पण शेवटी समुद्राला मिळाल्यावर त्या एकरूपच होतात,
तैसीं दोनी ये मतें । सूचिती एका कारणातें ।
परी उपास्ति ते योग्यते - । आधीन असे ॥ ४० ॥
त्याप्रमाणे हे दोन्ही मार्ग एकाच ध्येयाकडे निर्देश करतात, परंतु त्यांची साधना ही साधकाच्या योग्यतेवर अवलंबून असते.
देखें उत्प्लवनासरिसा । पक्षी फळासि झोंबे जैसा ।
सांगें नरु केवीं तैसा । पावे वेगां ॥ ४१ ॥
हे पहा, जसा एखादा पक्षी थेट उडून फळावर झडप घालतो, तसा एखादा मनुष्य एवढ्या वेगाने त्या फळाप्रत (मोक्षाप्रत) कसा पोहोचू शकेल?
तो हळूहळू ढाळेंढाळें । केतुकेनि एके वेळे ।
मार्गाचेनि बळें । निश्चित ठाकी ॥ ४२ ॥
तो मनुष्य हळूहळू, सावधपणे मार्ग आक्रमीत, काही काळाने त्या मार्गाच्या बळावर निश्चितपणे ध्येयापर्यंत पोहोचतो.
तैसें देख पां विहंगममतें । अधिष्ठूनि ज्ञानातें ।
सांख्य सद्य मोक्षातें । आकळिती ॥ ४३ ॥
त्याप्रमाणे, जणू पक्ष्यांच्या मार्गाचा (थेट उडण्याचा) अवलंब करून सांख्यज्ञानी हे थेट आत्मज्ञानाचा आश्रय घेऊन तत्काळ मोक्ष हस्तगत करतात.
येर योगिये कर्माधारें । विहितेंचि निजाचारें ।
पूर्णता अवसरें । पावतें होती ॥ ४४ ॥
तर दुसरे योगी कर्माचा आधार घेऊन, आपल्या विहित कर्तव्यांचे योग्य आचरण करत हळूहळू योग्य वेळी पूर्णत्वाला पोहोचतात.
न कर्मणामनारभान् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते ।
न च संन्यसनादेव सिद्धिं समाधिगच्छति ॥ ४ ॥
विहित कर्माचा आरंभ न करता मनुष्य निष्कर्मतेचा आनंद मिळवू शकत नाही, तसेच केवळ कर्माचा संन्यास (त्याग) केल्यानेच कोणाला सिद्धी किंवा मोक्ष प्राप्त होत नाही.
वांचोनि कर्मारंभ उचित । न करितांचि सिद्धवत ।
कर्महीना निश्चित । होईजेना ॥ ४५ ॥
योग्य कर्माचा आरंभ केल्याशिवाय, केवळ कर्मे न करता बसल्याने कोणीही सिद्ध पुरुषाप्रमाणे कर्मशून्य अवस्थेला पोहोचू शकत नाही.
कां प्राप्तकर्म सांडिजे । येतुलेनि नैष्कर्म्या होईजे ।
हें अर्जुना वायां बोलिजे । मूर्खपणें ॥ ४६ ॥
किंवा वाट्याला आलेले कर्तव्य कर्म सोडून देणे म्हणजेच कर्मशून्य होणे, असे समजणे हे केवळ मूर्खपणाचे बोलणे आहे, हे अर्जुना लक्षात ठेव.
सांगें पैलतीरा जावें । ऐसें व्यसन कां जेथ पावे ।
तेथ नावेतें त्यजावें । घडे केवीं ॥ ४७ ॥
जर नदीच्या पैलतीराला जाण्याची तीव्र इच्छा असेल, तर प्रवासाच्या मध्यभागी असताना नावेचा त्याग कसा करता येईल?
ना तरी तृप्ति इच्छिजे । तरी कैसेनि पाकु न कीजे ।
कीं सिद्धुही न सेविजे । केवीं सांगें ॥ ४८ ॥
किंवा जर भूक भागवायची असेल, तर स्वयंपाक न करता आणि समोर तयार असलेले अन्न न जेवता भूक कशी शमणार, हे मला सांग.
जंव निरार्तता नाहीं । तंव व्यापारु असे पाहीं ।
मग संतुष्टीचां ठायीं । कुंठे सहजें ॥ ४९ ॥
जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही, तोपर्यंत धडपड चालूच असते; आणि एकदा का पूर्ण समाधान मिळाले की सर्व हालचाली आपोआप थांबतात.
म्हणोनि आइकें पार्था । जया नैष्कर्म्यपदीं आस्था ।
तया उचित कर्म सर्वथा । त्याज्य नोहे ॥ ५० ॥
म्हणूनच हे पार्था ऐक, ज्याला कर्मशून्य (मुक्त) अवस्थेची ओढ आहे, त्याने विहित कर्मे सोडणे कधीही योग्य नाही.
आणि आपुलालिया चाडे । आपादिले हे मांडे ।
कीं त्यजिलें हें कर्म सांडे । ऐसें आहे ॥ ५१ ॥
आपण स्वतःच्या इच्छेने कर्मे निर्माण केली आणि आपण ती सोडली की कर्म सुटले, असे कधी घडते का?
हें वायाचि सैरा बोलिजे । उकलु तरी देखों पाहिजे ।
परी त्यजितां कर्म न त्यजे । निभ्रांत मानी ॥ ५२ ॥
हे केवळ वरवरचे बोलणे आहे, याचे मूळ कारण समजून घेतले पाहिजे; मनुष्य कितीही प्रयत्न करत असला तरी केवळ बाहेरून सोडल्याने कर्म सुटत नाही, हे निश्चित समज.
न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् ।
कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैगुणैः ॥ ५ ॥
कारण कोणताही मनुष्य कोणत्याही काळात क्षणभरही कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही; सर्व मनुष्यजात प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांमुळे परतंत्र होऊन कर्म करण्यास भाग पाडली जाते.
जंव प्रकृतीचें अधिष्ठान । तंव सांडी मांडी हें अज्ञान ।
जि चेष्टा गुणाधीन । आपैसी असे ॥ ५३ ॥
जोपर्यंत प्रकृतीचा अंमल शरीरावर आहे, तोपर्यंत 'मी कर्म सोडले' किंवा 'मी कर्म केले' असे म्हणणे केवळ अज्ञान आहे; कारण शरीराची सर्व हालचाल गुणांच्या अधीन राहून आपोआप घडत असते.
देखें विहित कर्म जेतुलें । तें सळें जरी वोसंडिलें ।
तरी स्वभाव काय निमाले । इंद्रियांचे ॥ ५४ ॥
जर योग्य असणारी सर्व विहित कर्मे बळजबरीने सोडून दिली, तरी इंद्रियांचे उपजत स्वभाव कधी नष्ट होतात का?
सांगे श्रवणीं ऐकावें ठेलें । की नेत्रीचे तेज गेलें ।
हें नासारंध्र बुझालें । परिमळु नेघे ॥ ५५ ॥
कानाने ऐकणे थांबवले आहे का? किंवा डोळ्यांचे पाहणे बंद झाले आहे का? नाकाची छिद्रे बंद होऊन त्यांनी सुवास घेणे सोडले आहे का?
ना तरी प्राणापानगति । की निर्विकल्प जाहली मति ।
कीं क्षुधातृषादि आर्ति । खुंटलिया ॥ ५६ ॥
किंवा श्वासोच्छ्वासाची गती थांबली आहे का? बुद्धी पूर्णपणे संकल्प-विकल्पांशिवाय झाली आहे का? किंवा भूक आणि तहान या संवेदना संपल्या आहेत का?
हे स्वप्नावबोधु ठेले । कीं चरण चालो विसरले ।
हे असो काय निमाले । जन्ममृत्यू ॥ ५७ ॥
स्वप्न पडणे किंवा जागे होणे थांबले आहे का? पाय चालणे विसरले आहेत का? आणि हे सर्व राहू द्या, पण जन्म आणि मृत्यूचे चक्र तरी संपले आहे का?
हें न ठकेचि जरी कांही । तरी सांडिले तें कायी ।
म्हणोनि कर्मत्यागु नाही । प्रकृतिमंतां ॥ ५८ ॥
जर यातील काहीही थांबत नाही, तर मग तुम्ही नेमके काय सोडले? म्हणूनच जोपर्यंत प्रकृतीचा संबंध आहे, तोपर्यंत खरा कर्मत्याग होऊच शकत नाही.
कर्म पराधीनपणे । निपजतसे प्रकृतिगुणें ।
येरीं धरीं मोकलीं अंतःकरणें । वाहिजे वायां ॥ ५९ ॥
कर्म हे प्रकृतीच्या गुणांमुळे पूर्णपणे परतंत्रपणे घडत असते, मग 'मी कर्म धरतो' किंवा 'मी ते सोडतो' असा मनाचा खोटा अहंकार बाळगणे व्यर्थ आहे.
देखें रथीं आरूढिजे । मग निश्चळा बैसिजे ।
मग चळा होऊनि हिंडिजे । परतंत्रा ॥ ६० ॥
जसे रथात बसल्यावर आपण स्वतः शांत बसलो तरी रथाच्या गतीमुळे आपल्याला परतंत्रपणे फिरावेच लागते,
कां उचलिलें वायुवशें । चळें शुष्क पत्र जैसें ।
निचेष्ट आकाशे । परिभ्रमे ॥ ६१ ॥
किंवा वाऱ्याच्या वेगाने उडालेले सुके पान स्वतः कोणतीही हालचाल न करता केवळ वाऱ्याच्या बळाने आकाशात इकडेतिकडे फिरत राहते,
तैसें प्रकृतिआधारें । कर्मेंद्रियविकारें ।
मिष्कर्म्युही व्यापारे । निरंतर ॥ ६२ ॥
त्याप्रमाणे प्रकृतीचा आश्रय असल्यामुळे, कर्मेंद्रियांच्या नैसर्गिक हालचालींमुळे स्वतःला कर्मशून्य मानणारा मनुष्यही निरंतर कोणत्या ना कोणत्या कर्मात गुंतलेलाच असतो.
म्हणऊनि संगु जंव प्रकृतिचा । तंव त्यागु न घडे कर्माचा ।
ऐसियाहि करूं म्हणती तयांचा । आग्रहोचि उरें ॥ ६३ ॥
म्हणूनच जोपर्यंत प्रकृतीचा संबंध आहे, तोपर्यंत कर्माचा खरा त्याग घडणे शक्य नाही; आणि तरीही जे लोक 'आम्ही कर्म सोडले' असा हट्ट धरतात, तो केवळ त्यांचा खोटा आग्रह ठरतो.
कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् ।
इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उचयते ॥ ६ ॥
जो मनुष्य कर्मेंद्रियांना बळजबरीने रोखून धरतो, परंतु मनात मात्र इंद्रियांच्या विषयांचेच चिंतन करत राहतो, असा मूर्ख अंतःकरणाचा मनुष्य ढोंगी किंवा दांभिक म्हटला जातो.
जे उचित कर्म सांडिती । मग नैष्कर्म्य होऊं पाहती ।
परी कर्मेंद्रियप्रवृत्ती । निरोधूनि ॥ ६४ ॥
जे लोक योग्य असलेले कर्म सोडून देतात आणि कर्मेंद्रियांच्या हालचाली बळजबरीने रोखून धरून कर्मशून्य होऊ पाहतात,
तयां कर्मत्यागु न घडे । जें कर्तव्य मनीं सापडे ।
वरी नटती तें फुडे । दरिद्र जाण ॥ ६५ ॥
त्यांचा तो कर्मत्याग खरा नसतो, कारण त्यांच्या मनात कर्माचे चिंतन चालूच असते; असे लोक बाहेरून विरक्तपणाचे नाटक करतात, पण आतून ते विचारांनी दरिद्री असतात.
ऐसे ते पार्था । विषयासक्त सर्वथा ।
वोळखावे तत्वता । येथ भ्रांति नाहीं ॥ ६६ ॥
हे पार्था, अशा लोकांना तू पूर्णपणे विषयासक्तच समज; यामध्ये शंका बाळगण्याचे काहीच कारण नाही.
आतां देई अवधान । प्रसंगे तुज सांगेन ।
या नैराश्याचे चिन्ह । धनुर्धरा ॥ ६७ ॥
आता हे धनुर्धरा, तू लक्ष दे; या प्रसंगाला अनुसरून मी तुला खऱ्या अनासक्त (निष्काम) पुरुषाची लक्षणे सांगतो.
यस्तित्वंद्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन ।
कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः न विशिष्यते ॥ ७ ॥
परंतु, हे अर्जुना, जो मनुष्य मनाच्या साहाय्याने ज्ञानेंद्रियांवर नियंत्रण मिळवून, आसक्ती सोडून, कर्मेंद्रियांद्वारे निष्काम कर्मयोगाचे आचरण करतो, तोच श्रेष्ठ ठरतो.
जो अंतरी दृढु । परमात्मरूपीं गूढु ।
बाह्य तरी रूढु । लौकिक जैसा ॥ ६८ ॥
जो अंतःकरणाने दृढ असून परमात्मस्वरूपात मग्न असतो, परंतु बाहेरून पाहता सामान्य व्यवहार करणाऱ्या माणसासारखाच दिसतो,
तो इंद्रियां आज्ञा न करी । विषयांचे भय न धरी ।
प्राप्त कर्म न अव्हेरी । उचित जें जें ॥ ६९ ॥
जो इंद्रियांच्या अधीन होत नाही आणि विषयांचे भयही बाळगत नाही, तसेच जे जे योग्य आणि वाट्याला आलेले कर्म आहे त्याचा कधी तिरस्कार करत नाही,
तो कर्मेंद्रियें कर्मी । राहाटतां तरी न नियमी ।
परी तेथिचेनि उर्मी । झांकोळेना ॥ ७० ॥
कर्मेंद्रिये कर्मात गुंतलेली असताना तो त्यांच्यावर बळजबरी करत नाही, पण कर्माच्या वासनेच्या लहरी त्याला कधीही व्यापून टाकत नाहीत,
तो कामनामात्रें न घेपे । मोहमळें न लिंपे ।
जैसे जळीं जळें न शिंपें । पद्मपत्र ॥ ७१ ॥
ज्याप्रमाणे कमळाचे पान पाण्यात असूनही पाण्याने ओले होत नाही, त्याप्रमाणे तो कोणत्याही इच्छेने बांधला जात नाही आणि मोहाच्या मळाने माखत नाही,
तैसा संसर्गामाजि असे । सकळांसारिखा दिसे ।
जैसें तोयसंगे आभासे । भानुबिंब ॥ ७२ ॥
पाण्यातील सूर्याचे प्रतिबिंब पाण्याशी संबंधित दिसले तरी जसे ते कोरडेच असते, त्याप्रमाणे तो लोकात वावरत असताना सर्वांसारखाच भासला तरी अलिप्त असतो,
तैसा सामन्यत्वें पाहिजे । तरी साधारणुचि देखिजे ।
येरवीं निर्धारितां नेणिजे । सोय जयाची ॥ ७३ ॥
त्याला सहजपणे पाहिले तर तो अगदी सामान्य माणसासारखाच वाटतो, परंतु खरोखर विचारात घेतले तर त्याच्या खऱ्या स्वरूपाचा अंत लागत नाही,
ऐसां चिन्हीं चिन्हितु । देखसी तोचि तरी मुक्तु ।
आशापाशरहितु । वोळख पां ॥ ७४ ॥
अशा लक्षणांनी युक्त असलेल्या पुरुषालाच तू खरोखर मुक्त आणि सर्व आशांच्या पाशातून सुटलेला समज.
अर्जुना तोचि योगी । विशेषिजे जो जगीं ।
म्हणोनि ऐसा होय यालागी । म्हणिपे तूंते ॥ ७५ ॥
हे अर्जुना, जगामध्ये तोच खरा योगी श्रेष्ठ मानला जातो, म्हणूनच मी तुला तसा होण्यासाठी सांगत आहे.
तूं मानसा नियमु करीं । निश्चळु होय अंतरी ।
मग कर्मेंद्रियें हीं व्यापारीं । वर्ततु सुखें ॥ ७६ ॥
तू तुझ्या मनावर ताबा ठेव, अंतःकरणाने शांत आणि निश्चल हो; आणि मग कर्मेंद्रियांद्वारे सहजपणे व्यावहारिक कर्मे करत राहा.
नियतं कुरु कर्म त्वं ज्यायो ह्यकर्मणः ।
शरीरयात्रापि च ते न प्रसिध्येदकर्मणः ॥ ८ ॥
तू तुझे विहित कर्तव्य कर्म कर, कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे हे श्रेष्ठ आहे; तसेच कर्म न केल्यास तुझा शरीरनिर्वाह देखील चालणे शक्य नाही.
म्हणशी नैष्कर्म्य होआवें । तरी एथ तें न संभवे ।
आणि निषिद्ध केवीं राहाटावें । विचारी पां ॥ ७७ ॥
जर तू म्हणशील की मी पूर्णपणे कर्मशून्य व्हावे, तर ते या देहावस्थेत शक्य नाही; आणि शास्त्रविरुद्ध निषिद्ध कर्मे कशी करावीत, याचा तूच विचार कर.
म्हणोनि जें जें उचित । आणि अवसरेंकरून प्राप्त ।
तें कर्म हेतुरहित । आचर तूं ॥ ७८ ॥
म्हणूनच जे योग्य आहे आणि प्रसंगाने वाट्याला आले आहे, ते कर्तव्य कर्म तू कोणत्याही फलाशा किंवा हेतू न बाळगता करत राहा.
पार्था आणिकही एक । नेणसी तूं हे कवतिक ।
जें ऐसें कर्म मोचक । आपैसें असे ॥ ७९ ॥
हे पार्था, तुला आणखी एक नवल ठाऊक नाही, ते म्हणजे असे निष्काम बुद्धीने केलेले कर्म स्वतःच माणसाला बंधनातून मुक्त करणारे ठरते.
देखें अनुक्रमाधारें । स्वधर्मु जो आचरे ।
तो मोक्षु तेणें व्यापारें । निश्चित पावे ॥ ८० ॥
हे पहा, जो शास्त्रोक्त पद्धतीनुसार आपल्या स्वधर्माचे आचरण करतो, तो त्या कर्माच्या द्वारेच निश्चितपणे मोक्षाला प्राप्त होतो.
यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबंधनः ।
तदर्थे कर्म कौंतेय मुक्तसङगः समाचरः ॥ ९ ॥
यज्ञासाठी (भगवत्सेवेसाठी) केल्या जाणाऱ्या कर्माव्यतिरिक्त इतर कर्मांमुळे हा मनुष्यलोक बंधनात पडतो; म्हणून, हे कुंतीपुत्रा, तू आसक्ती सोडून केवळ यज्ञासाठीच आपले कर्तव्य कर्म कर.
स्वधर्मु जो बापा । तोचि नित्ययज्ञु जाण पां ।
म्हणोनि वर्ततां तेथ पापा । संचारु नाहीं ॥ ८१ ॥
हे प्रिय अर्जुना, आपला स्वधर्म म्हणजेच नित्य चालणारा यज्ञ आहे, हे तू नीट समजून घे; आणि त्याचे आचरण करताना पापाचा स्पर्श कधीही होत नाही.
हा निजधर्मु जैं सांडे । कुकर्मी रति घडे ।
तैंचि बंधु पडे । संसारिकु ॥ ८२ ॥
जेव्हा हा स्वतःचा धर्म सुटतो आणि वाईट कर्मांमध्ये माणसाची प्रवृत्ती होते, तेव्हाच त्याला संसाराचे बंधन प्राप्त होते.
म्हणोनि स्वधर्मानुष्ठान । ते अखंड यज्ञयाजन ।
जो करी तया बंधन । कहींच नाहीं ॥ ८३ ॥
म्हणूनच स्वधर्माचे आचरण करणे हाच निरंतर चालणारा यज्ञ आहे; आणि जो हे करतो, त्याला कधीही कर्माचे बंधन पडत नाही.
हा लोकु कर्में बांधिला । जो परतंत्रा भुतला ।
तो नित्ययज्ञाते चुकला । म्हणोनियां ॥ ८४ ॥
हा मनुष्यलोक केवळ कर्माने बांधला गेला आहे आणि भ्रमात पडला आहे, कारण तो या नित्य चालणाऱ्या स्वधर्मरूपी यज्ञाला विसरला आहे.
आतां येचिविशीं पार्था । तुज सांगेन एकी मी कथा ।
जैं सृष्ट्यादि संस्था । ब्रह्मेनि केली ॥ ८५ ॥
आता हे पार्था, या विषयावर मी तुला एक कथा सांगतो; जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली,
सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः ।
अनेन प्रसविष्यध्वमेष वोऽस्त्विष्टकामधुक् ॥ १० ॥
सृष्टीच्या आरंभी प्रजापतीने यज्ञासहित प्रजेची निर्मिती केली आणि त्यांना सांगितले की, तुम्ही या यज्ञाद्वारे आपली प्रगती करून घ्या; हा यज्ञ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा (कामधेनू) ठरो.
तें नित्ययागसहितें । सृजिलीं भूतें समस्तें ।
परी नेणतीचि तिये यज्ञातें । सूक्ष्म म्हणऊनी ॥ ८६ ॥
ब्रह्मदेवाने सर्व प्राणिमात्रांना या नित्य चालणाऱ्या यज्ञासह जन्माला घातले, परंतु हा यज्ञ अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे प्राण्यांना त्याची जाणीव नव्हती.
तें वेळीं प्रजीं विनविला ब्रह्मा । देवा आश्रयो काय एथ आम्हां ।
तंव म्हणे तो कमळजन्मा । भूतांप्रति ॥ ८७ ॥
तेव्हा प्रजेने ब्रह्मदेवाला विनंती केली की, हे देवा, आमचा आधार काय? त्यावर त्या कमळातून जन्मलेल्या ब्रह्मदेवाने सर्व प्राण्यांना सांगितले की,
तुम्हां वर्णविशेषवशें । आम्हीं हा स्वधर्मुचि विहिला असे ।
यातें उपासा मग आपैसे । काम पुरती ॥ ८८ ॥
तुमच्या वर्णानुसार आम्ही हा स्वधर्मच तुमच्यासाठी ठरवून दिला आहे; तुम्ही याचीच उपासना करा, म्हणजे तुमच्या सर्व इच्छा आपोआप पूर्ण होतील.
तुम्हीं व्रतें नियमु न करावे । शरीरातें न पीडावें ।
दुरी केंही न वचावे । तीर्थासी गा ॥ ८९ ॥
तुम्हाला अवघड व्रते किंवा नियम करण्याची गरज नाही, शरीराला त्रास देण्याची गरज नाही आणि कुठेही दूरच्या तीर्थयात्रेला जाण्याचीही गरज नाही.
योगादिक साधनें । साकांक्ष आराधनें ।
मंत्रयंत्रविधानें । झणीं करा ॥ ९० ॥
तुम्ही योगासारखी कठीण साधने, फलाशा धरून केली जाणारी आराधने किंवा तंत्र-मंत्राची अवघड विधाने करू नका.
देवतांतरा न भजावें । हें सर्वथा कांहीं न करावे ।
तुम्हीं स्वधर्मयज्ञीं यजावें । अनायासें ॥ ९१ ॥
तुम्ही इतर देवांची भक्ती करू नका, असे काहीही करण्याची गरज नाही; तुम्ही केवळ आपल्या स्वधर्मरूपी यज्ञातच अगदी सहजपणे समर्पित व्हा.
अहेतुकें चित्तें । अनुष्ठां पां ययातें ।
पतिव्रता पतीतें । जियापरी ॥ ९२ ॥
ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री निष्काम मनाने केवळ पतीची सेवा करते, त्याप्रमाणे तुम्ही कोणत्याही फलाशेविना या स्वधर्माचे आचरण करा.
तैसा स्वधर्मरूप मखु । हाचि सेव्य तुम्हां एकु ।
ऐसें सत्यलोकनायकु । म्हणता जहाला ॥ ९३ ॥
अशा प्रकारे स्वधर्माचे आचरण हाच तुमच्यासाठी एकमेव योग्य यज्ञ आहे, असे तो सत्यलोकाचा स्वामी ब्रह्मदेव म्हणाला.
देखा स्वधर्मातें भजाल । तरी कामधेनु हा होईल ।
मग प्रजाहो न संडील । तुमतें सदा ॥ ९४ ॥
जर तुम्ही तुमच्या स्वधर्माचे मनापासून आचरण कराल, तर हा स्वधर्मच तुमच्यासाठी कामधेनू ठरेल आणि तो तुम्हाला कधीही अंतर देणार नाही.
देवान् भावयतानेन ते देवाः भावयंतु वः ।
परस्परं भावयंतः श्रेयः परमवाप्स्यच ॥ ११ ॥
तुम्ही या यज्ञाद्वारे देवांना संतुष्ट करा आणि ते देव तुम्हाला सुख देऊन संतुष्ट करतील; अशा प्रकारे एकमेकांना संतुष्ट करत तुम्ही परम कल्याणाला प्राप्त व्हाल.
जें येणेचिकरूनि समस्तां । परितोषु होईल देवतां ।
मग ते तुम्हां ईप्सीता । अर्थांते देती ॥ ९५ ॥
कारण तुमच्या या स्वधर्मपालनाने सर्व देवता तृप्त होतील आणि मग त्या तुम्हाला तुमच्या मनातील सर्व इच्छित गोष्टी देतील.
या स्वधर्मपूजा पूजितां । देवतागणां समस्तां ।
योगक्षेमु निश्चिता । करिती तुमचा ॥ ९६ ॥
या स्वधर्माच्या पूजेने जेव्हा सर्व देवता तृप्त होतील, तेव्हा त्या निश्चितपणे तुमच्या सर्व गरजा आणि योगक्षेम सांभाळतील.
तुम्हीं देवतांते भजाल । देव तुम्हां तुष्टितील ।
ऐसी परस्परें घडेल । प्रीति तेथ ॥ ९७ ॥
तुम्ही देवांना पुजाल आणि देव तुम्हाला प्रसन्न होतील, यामुळे तुमच्यामध्ये परस्परांबद्दल आपुलकी आणि प्रेम निर्माण होईल.
तेथ तुम्हीं जें करूं म्हणाल । ते आपैसे सिद्धी जाईल ।
वांछितही पुरेल । मानसींचे ॥ ९८ ॥
त्यामुळे तुम्ही जे काही काम हाती घ्याल ते आपोआप यशस्वी होईल आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.
वाचासिद्धी पावाल । आज्ञापक होआल ।
म्हणिये तुमतें मागतील । महाऋद्धि ॥ ९९ ॥
तुमची वाणी सिद्ध होईल, तुम्हाला अधिकार प्राप्त होईल आणि महान सिद्धी देखील स्वतः तुमच्याकडे येण्याची याचना करतील.
जैसें ऋतुपतींचे द्वार । वनश्री निरंतर ।
वोळगे फळभार । लावण्येंसी ॥ १०० ॥
ज्याप्रमाणे वसंत ऋतूच्या दारात वनदेवता स्वतः फळांनी आणि फुलांनी बहरून सुंदरपणे उभी राहते,
इष्टान् भोगान् हि वो देवा दास्यंते यज्ञभाविताः ।
तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुङक्ते स्तेन एव सः ॥ १२ ॥
यज्ञाने तृप्त झालेले देव तुम्हाला तुमच्या आवडीचे सर्व भोग देतील; परंतु त्यांनी दिलेले हे भोग त्यांना अर्पण न करता जो स्वतःच उपभोगतो, तो केवळ चोरच आहे.
तैसें सर्व सुखेंसहित । दैवचि मूर्तिमंत ।
येईल देखा काढत । तुम्हापांठी ॥ १०१ ॥
त्याप्रमाणे सर्व सुखांनी युक्त असलेले भाग्य स्वतः मूर्तिमंत होऊन तुमच्या मागेमागे येईल.
ऐसे समस्त भोगभरित । होआल तुम्ही अनार्त ।
जरी स्वधर्मैकनिरत । वर्ताल बापा ॥ १०२ ॥
जर तुम्ही केवळ स्वधर्माचेच आचरण करण्यात मग्न राहिलात, तर तुम्ही सर्व भोगांनी संपन्न आणि तृप्त व्हाल.
कां जालिया सकल संपदा । जो अनुसरेल इंद्रियमदा ।
लुब्ध होऊनियां स्वादां । विषयांचिया ॥ १०३ ॥
परंतु जर सर्व संपत्ती प्राप्त झाल्यावर, एखादा माणूस इंद्रियांच्या सुखात गुंतून विषयांच्या गोडीला चटावला,
तिहीं यज्ञभाविकीं सुरीं । जे हे संपत्ति दिधली पुरी ।
तयां स्वमार्गीं सर्वेश्वरीं । न भजेल तो ॥ १०४ ॥
आणि यज्ञाने संतुष्ट झालेल्या देवांनी दिलेली ही समृद्धी भोगताना, जो त्या जगदीश्वराची स्वधर्माने पूजा करत नाही,
अग्निमुखीं हवन । न करील देवतापूजन ।
प्राप्त वेळे भोजन । ब्राह्मणांचे ॥ १०५ ॥
जो अग्नीमध्ये आहुती देत नाही, देवपूजा करत नाही आणि योग्य वेळी आदराने ब्राह्मणांना भोजन घालत नाही,
विमुखु होईल गुरुभक्ती । आदरु न करील अतिथी ।
संतोषु नेदील ज्ञाती । आपुलिये ॥ १०६ ॥
जो गुरूंच्या भक्तीपासून विमुख होतो, अतिथीचा सत्कार करत नाही आणि आपल्या बांधवांना संतुष्ट करत नाही,
ऐसा^स्वधर्मक्रियारहितु । आथिलेपणे प्रमत्तु ।
केवळ भोगासक्तु । होईल जो ॥ १०७ ॥
असा स्वधर्माचे आचरण न करणारा, संपत्तीच्या गर्वाने अंध झालेला आणि केवळ स्वतःच्या चैनीत दंग असलेला मनुष्य जो कोणी असेल,
तया मग अपावो थोरु आहे । जेणें तें हातीचे सकळ जाये ।
देखा प्राप्तही न लाहे । भोग भोगूं ॥ १०८ ॥
त्याच्यावर मोठा अनर्थ ओढवतो; त्याच्या हातातील सर्व काही निघून जाते आणि त्याला मिळालेले भोग भोगणे देखील अशक्य होते.
जैसें गतायुषीं शरीरीं । चैतन्य वासु न करी ।
कां निदैवाचां घरीं । न राहे लक्ष्मी ॥ १०९ ॥
ज्याप्रमाणे आयुष्य संपलेल्या शरीरात प्राण राहत नाहीत, किंवा दुर्दैवी माणसाच्या घरात लक्ष्मी टिकत नाही,
तैसा स्वधर्मु जरी लोपला । तरी सर्व सुखांचा थारा मोडला।
जैसा दीपासवे हरपला । प्रकाशु जाय ॥ ११० ॥
त्याप्रमाणे जर स्वधर्म नाहीसा झाला, तर सर्व सुखांचा पायाच ढासळतो; जसा दिवा विझल्यावर त्यासोबतचा प्रकाशही नष्ट होतो,
तैसी निजवृत्ति जेथ सांडे । तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे ।
आइका प्रजाहो हे फुडें । विरंचि म्हणे ॥ १११ ॥
त्याप्रमाणे जिथे स्वधर्माचा आचरण थांबते, तिथे आनंदाचे आणि स्वातंत्र्याचे अस्तित्व उरत नाही, असे ब्रह्मदेव प्रजेला स्पष्टपणे म्हणाला.
म्हणऊनि स्वधर्मु जो सांडील । तयातें काळु दंडील ।
चोरु म्हणूनि हरील । सर्वस्व तयांचे ॥ ११२ ॥
म्हणूनच जो आपला स्वधर्म सोडेल, त्याला काळाची शिक्षा भोगावी लागेल आणि काळ त्याला चोर ठरवून त्याचे सर्वस्व हरण करेल.
मग सकळ दोष भंवते । गिंवसोनि घेती तयातें ।
रात्रिसमयीं स्मशानातें । भूतें जैशी ॥ ११३ ॥
मग रात्रीच्या वेळी स्मशानात भूते जमा व्हावीत, त्याप्रमाणे सर्व वाईट दोष त्याला चहुबाजूंनी वेढून घेतात.
तैशी त्रिभुवनींची दुःखे । आणि नानाविध पातकें ।
दैन्यजात तितुकें । तेथेंचि वसे ॥ ११४ ॥
तिन्ही लोकातील सर्व दुःखे, विविध प्रकारची पापे आणि सर्व गरिबी केवळ त्याच ठिकाणी येऊन वास करतात.
ऐसें होय तया उन्मत्ता । मग न सुटे बापां रुदतां ।
परी कल्पांतीहीं सर्वथा । प्राणिगण हो ॥ ११५ ॥
अशा गर्विष्ठ माणसाची अशी दुर्दशा होते की, मग त्याने कितीही आक्रोश केला तरी सृष्टीच्या अंतापर्यंत त्याची सुटका होत नाही.
म्हणोनि निजवृत्ति हे न संडावी । इंद्रिये बरळों नेदावीं ।
ऐसें प्रजांते शिकवी । चतुराननु ॥ ११६ ॥
म्हणूनच आपल्या स्वधर्माचा कधीही त्याग करू नका आणि इंद्रियांना स्वैरपणे भटकू देऊ नका, असे ब्रह्मदेवाने प्रजेला शिकवले.
जैसें जळचरां जळ सांडे । आणि तत्क्षणीं मरण मांडे ।
हा स्वधर्मु तेणें पाडें । विसंबों नये ॥ ११७ ॥
ज्याप्रमाणे पाण्यातील प्राण्यांनी पाणी सोडल्यास त्यांना तत्काळ मरण येते, त्याचप्रमाणे या स्वधर्माला आपण क्षणभरही विसरता कामा नये.
म्हणोनि तुम्ही समस्तीं । आपुलालिया कर्मीं उचितीं ।
निरत व्हावें पुढतपुढती । म्हणिपत असे ॥ ११८ ॥
म्हणूनच तुम्ही सर्वांनी आपापल्या योग्य कर्तव्यांचे मनापासून आचरण करत राहावे, हे मी तुम्हाला वारंवार सांगत आहे.
यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यते सर्वकिल्बिषैः ।
भुङजते ते त्वघं पापा ये पचंत्यात्मकारणात् ॥ १३ ॥
यज्ञात उरलेले अन्न खाणारे श्रेष्ठ पुरुष सर्व पापांतून मुक्त होतात; परंतु जे केवळ स्वतःच्या पोटासाठीच अन्न शिजवून खातात, ते पापी लोक केवळ पापच खातात.
देखा विहित क्रियविधी । निर्हेतुका बुद्धी ।
जो असतिये समृद्धी । विनियोगु करी ॥ ११९ ॥
जो मनुष्य आपल्या वाट्याला आलेली कर्तव्ये निष्काम बुद्धीने पार पाडतो आणि स्वतःपाशी असलेल्या संपत्तीचा योग्य विनियोग करतो,
गुरु गोत्र अग्नि पूजी । अवसरीं भजे द्विजीं ।
निमितादिकीं यजी । पितरोद्देश ॥ १२० ॥
जो गुरूंची, कुळदेवतेची आणि अग्नीची पूजा करतो, प्रसंगी ब्राह्मणांचा आदर करतो आणि योग्य प्रसंगी पितरांचे श्राद्ध करतो,
या यज्ञक्रिया उचिता । यज्ञेशीं हवन करितां ।
हुतशेष स्वभावतः । उरे जें जें ॥ १२१ ॥
अशा या योग्य यज्ञक्रिया करून भगवंताला आहुती दिल्यावर, जे काही अन्न शिल्लक राहते,
तें सुखे आपुलां घरीं । कुटुंबेसीं भोजन करी ।
कीं भोग्यचि तें निवारी । कल्मषातें ॥ १२२ ॥
ते अन्न जो आपल्या घरी कुटुंबासह समाधानाने ग्रहण करतो, ते भोजनच त्याचे सर्व दोष आणि पापे नष्ट करते.
तें यज्ञावशिष्ट भोगी । म्हणोनि सांडिजे तो अधीं ।
जयापरी महारोगीं । अमृतसिद्धी ॥ १२३ ॥
तो यज्ञातील उरलेले अन्न सेवन करत असल्यामुळे सर्व पापांपासून अलिप्त राहतो; जसे कुष्ठरोग्याला अमृताची प्राप्ती व्हावी आणि तो निरोगी व्हावा, त्याप्रमाणे तो शुद्ध होतो.
कां तत्वनिष्ठु जैसा । नागवे भ्रांतिलेशा ।
तो शेषभोगी तैसा । नाकळे दोषा ॥ १२४ ॥
किंवा ज्याप्रमाणे आत्मज्ञानी पुरुष कधीही भ्रमात अडकत नाही, त्याप्रमाणे हे यज्ञावशिष्ट ग्रहण करणारा मनुष्य कर्माच्या दोषांना बळी पडत नाही.
म्हणोनि स्वधर्में जें अर्जें । तें स्वधर्मेचि विनियोगिजे ।
मग उरे तें भोगिजे । संतोषेंसीं ॥ १२५ ॥
म्हणूनच स्वधर्माने जे काही मिळवले आहे, त्याचा उपयोग स्वधर्माच्या कार्यातच करावा आणि त्यातून जे उरेल ते आनंदाने अनुभवावे.
हें वांचूनि पार्था । राहाटों नये अन्यथा ।
ऐसी आद्य ही कथा । मुरारी सांगे ॥ १२६ ॥
हे पार्था, याशिवाय इतर कोणत्याही मार्गाने वागू नये, अशी ही सृष्टीच्या आरंभीची कथा श्रीकृष्ण सांगत आहेत.
जें देहचि आपणपें मानिति । आणि विषयांते भोग्य म्हणती ।
यापरतें न स्मरती । आणिक कांही ॥ १२७ ॥
जे केवळ या शरीरालाच स्वतःचे स्वरूप मानतात आणि जगातील विषयांना केवळ उपभोगाचे साधन समजतात, त्यांना यापलीकडे काहीही सुचत नाही.
हे यज्ञोपकरण सकळ । नेणसांते बरळ ।
अहंबुद्धी केवळ । भोगूं पाहती ॥ १२८ ॥
ते अज्ञानाने या सर्व सृष्टीला केवळ स्वतःच्या उपभोगाचे साधन मानतात आणि केवळ स्वतःच्या अहंकाराने सर्व काही उपभोगू इच्छितात.
इंद्रियरुचीसारखे । करविती पाक निके ।
ते पापिये पातकें । सेविती जाण ॥ १२९ ॥
जे केवळ आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी उत्तम अन्न शिजवून घेतात, ते पापी लोक अन्न नाही तर केवळ पापच खात असतात, हे तू समज.
जे संपत्तिजात आघवें । हे हवनद्रव्य मानावें ।
मग स्वधर्मयज्ञें अर्पावें । आदिपुरुषी ॥ १३० ॥
आपल्याकडे असलेली सर्व संपत्ती हे यज्ञाचे साहित्य मानावे आणि आपल्या स्वधर्मरूपी यज्ञाद्वारे ते त्या परमेश्वराला अर्पण करावे.
हें सांडोनिया मूर्ख । आपणपेयांलागीं देख ।
निपजविती पाक । नानाविध ॥ १३१ ॥
हे सोडून जे मूर्ख लोक केवळ स्वतःच्या सुखासाठी नाना प्रकारचे अन्न शिजवतात,
जिहीं यज्ञु सिद्धी जाये । परेशा तोषु होये ।
तें हें सामान्य अन्न न होये । म्हणोनियां ॥ १३२ ॥
ज्या अन्नामुळे यज्ञ यशस्वी होतो आणि परमेश्वराला संतोष मिळतो, ते अन्न काही सामान्य अन्न असू शकत नाही.
हें न म्हणावें साधारण । अन्न ब्रह्मरूप जाण ।
जे जीवनहेतु कारण । विश्वा यया ॥ १३३ ॥
या अन्नाला तू सामान्य समजू नकोस, हे अन्न म्हणजेच प्रत्यक्ष ब्रह्मरूप आहे; कारण हेच या संपूर्ण विश्वाच्या जगण्याचे मूळ कारण आहे.
अन्नाद् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नस्संभवः ।
यज्ञाद् भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः ॥ १४ ॥
अन्नापासून सर्व प्राणी उत्पन्न होतात आणि वाढतात; त्या अन्नाची निर्मिती पावसापासून होते; पाऊस हा यज्ञापासून पडतो आणि यज्ञाची निर्मिती कर्म केल्यामुळे होते.
अन्नस्तव भूतें । प्ररोह पावति समस्तें ।
मग वरिषु या अन्नाते । सर्वत्र प्रसवे ॥ १३४ ॥
अन्नामुळेच सर्व सजीव वाढतात आणि समृद्ध होतात; आणि तो पाऊस या अन्नाची निर्मिती करण्यासाठी सर्वत्र पडतो.
त्या पर्जन्या यज्ञीं जन्म । यज्ञाते प्रगटी कर्म ।
कर्मासि आदि ब्रह्म । वेदरूप ॥ १३५ ॥
त्या पावसाचा जन्म यज्ञापासून होतो, यज्ञाची निर्मिती कर्माद्वारे होते आणि कर्माचे मूळ वेदरूप ब्रह्मामध्ये आहे.
कर्म ब्रह्मोद्बभवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवं ।
तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितं ॥ १५ ॥
कर्माची उत्पत्ती वेदांपासून झाली आहे आणि वेदांची उत्पत्ती कधीही नष्ट न होणाऱ्या (अक्षर) परमात्म्यापासून झाली आहे, असे समज; म्हणूनच ते सर्वव्यापी परब्रह्म या यज्ञामध्ये नेहमी स्थिर असते.
मग वेदांते परापर । प्रसवतसे अक्षर ।
म्हणऊनि हे चराचर । ब्रह्मबद्ध ॥ १३६ ॥
त्या परम अक्षरापासूनच श्रेष्ठ अशा वेदांची उत्पत्ती झाली आहे; म्हणूनच हे सर्व चराचर विश्व ब्रह्ममय आहे.
परी कर्माचिये मूर्ति । यज्ञीं अधिवासु श्रुती ।
ऐकें सुभद्रापती । अखंड गा ॥ १३७ ॥
परंतु कर्माच्या रूपाने वेदांचा वास या यज्ञाच्या ठिकाणी नेहमी असतो, हे सुभद्रेच्या पती अर्जुना, तू लक्षपूर्वक ऐक.
एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः ।
अघायुरिंद्रियारामो मोघं पार्थ स जीवती ॥ १६ ॥
अशा प्रकारे सृष्टीच्या सुरुवातीला निर्माण झालेल्या या जीवनचक्राचे जो या जगात पालन करत नाही, तो केवळ इंद्रियांच्या सुखात रमणारा पापी मनुष्य व्यर्थच जगतो.
ऐशीं आदि हे परंपरा । संक्षेपे तुज धनुर्धरा ।
सांगितली या अध्वरा । लागौनियां ॥ १३८ ॥
हे धनुर्धरा, यज्ञाच्या निमित्ताने मी तुला ही सृष्टीची मूळ परंपरा थोडक्यात सांगितली आहे.
म्हणूनसमूळ हा उचितु । स्वधर्मरूप क्रतु ।
नानुष्ठी जो मत्तु । लोकीं इये ॥ १३९ ॥
म्हणूनच या जगात जो गर्विष्ठ मनुष्य आपल्या अशा या कल्याणकारी स्वधर्मरूपी यज्ञाचे आचरण करत नाही,
तो पातकांचा राशि । केवळ भार भूमीसी ।
जो कुकर्में इंद्रियांसी । उपेगा गेला ॥ १४० ॥
जो माणूस वाईट कर्मांनी आपल्या इंद्रियांचे लाड पुरवतो (केवळ विषयभोगात मग्न राहतो), तो केवळ पापांचा साठा आहे आणि तो या पृथ्वीला निरर्थक भार ठरला आहे.
तें जन्म कर्म सकळ । अर्जुना अति निष्फळ ।
जैसे कां अभ्रपटळ । अकाळींचे ॥ १४१ ॥
हे अर्जुना, त्याचे जगणे आणि त्याचे सर्व कर्म विनामोसमाच्या ढगांसारखे पूर्णपणे निरुपयोगी आणि निष्फळ आहे.
कां गळा स्तन अजेचे । तैसें जियालें देखें तयाचें ।
जया अनुष्ठान स्वधर्माचें । घडेचिना ॥ १४२ ॥
शेळीच्या गळ्याला असलेल्या निरुपयोगी स्तनांसारखे त्याचे जगणे आहे, ज्याच्या हातून आपल्या स्वधर्माचे आचरण घडत नाही.
म्हणोनि ऐकें पांडवा । हा स्वधर्मु कवणे न संडावा ।
सर्वभावें भजावा । हाचि एकु ॥ १३३ ॥
म्हणूनच हे पांडवा ऐक, आपल्या स्वधर्माचा कोणीही कधी त्याग करू नये; प्रत्येकाने संपूर्ण भावाने केवळ याचेच पालन करावे.
हां गा शरीर जरी जाहलें । तरी कर्तव्य वोघें आले ।
मग उचित कां आपुले । वोसंडावे ॥ १४४ ॥
अहो, जर आपल्याला हे शरीर मिळाले आहे, तर त्यासोबत कर्तव्ये ही सहजपणे आलीच आहेत; मग आपण आपले विहित कर्तव्य का सोडून द्यावे?
परिस पां सव्यसाची । मूर्ती लाहोनि देहाचि ।
खंती करिती कर्माची । ते गावंढे गा ॥ १४५ ॥
हे अर्जुना ऐक, हे मानवी शरीर धारण करूनही जे कर्माचा कंटाळा करतात, ते मूर्ख आणि अडाणीच समजावेत.
यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः ।
आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्य न विद्यते ॥ १७ ॥
परंतु जो मनुष्य केवळ आत्मस्वरूपातच रममाण असतो, जो आत्मज्ञानाने पूर्ण तृप्त असतो आणि जो स्वतःमध्येच समाधानी असतो, त्याला कोणतेही कर्तव्य कर्म उरत नाही.
देखें असतेनि देहकर्में । एथ तोचि एकु न लिंपे कर्में ।
जो अखंडित रमे । आपणपांचि ॥ १४६ ॥
हे पहा, शरीराने कर्मे करत असूनही तोच एक मनुष्य कर्माच्या बंधनात अडकत नाही, जो नेहमी स्वतःच्या आत्मस्वरूपात मग्न असतो.
जे तो आत्मबोधें तोषला । तरी कृतकार्यु देखें जाहला ।
म्हणोनि सहजे सांडवला । कर्मसंगु ॥ १४७ ॥
कारण तो आत्मज्ञानाने पूर्ण समाधानी झाला असल्यामुळे त्याचे सर्व मनोरथ पूर्ण झाले आहेत, त्यामुळे कर्माचा संसर्ग किंवा आसक्ती त्याला सहजपणे सोडून जाते.
नैव तस्य कृतेनार्थो माकृतेनेह कश्चन ।
न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः ॥ १८ ॥
अशा महात्म्याला या जगात कर्म केल्याने काही मिळवायचे नसते आणि कर्म न केल्याने त्याचे काही नुकसानही होत नाही; तसेच त्याला सर्व प्राणिमात्रांमध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाचाही आधार घेण्याची गरज नसते.
तृप्ती झालिया जैसीं । साधना सरती आपैसीं ।
देखें आत्मतुष्टीं तैसीं । कर्मे नाही ॥ १४८ ॥
ज्याप्रमाणे पोट भरल्यावर जेवणाची साधने आपोआप बाजूला पडतात, त्याप्रमाणे आत्मस्वरूपात तृप्त झालेल्या व्यक्तीला कर्माची आवश्यकता उरत नाही.
जंववरी अर्जुना/तो बोध भेटेना मना/
तंवचि यया साधना/भजावे लागे॥ १४९ ॥
हे अर्जुना, जोपर्यंत मनाला तो आत्मबोध प्राप्त होत नाही, तोपर्यंतच या साधनेचे (कर्तव्याचे) मनापासून आचरण करावे लागते.
तस्मादसक्तः सततं कार्य कर्म समाचर ।
असक्तो ह्याचरन् कर्म पमाप्नोति पुरूषः ॥ १९ ॥
म्हणूनच तू आसक्ती सोडून नेहमी आपले कर्तव्य कर्म करत राहा; कारण फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करणारा मनुष्य परमपदाला प्राप्त होतो.
म्हणऊनि तूं नियतु । सकळ कामरहितु ।
होऊनियां उचितु । स्वधर्में रहाटें ॥ १५० ॥
म्हणूनच तू स्वतःवर नियंत्रण ठेवून, सर्व वासना सोडून, योग्य असलेल्या आपल्या स्वधर्माचे आचरण कर.
जे स्वकर्मे निष्कामता । अनुसरले पार्था ।
कैवल्य पर तत्वतां । पातले जगी ॥ १५१ ॥
हे पार्था, जे लोक आपल्या वाट्याला आलेले कर्म निष्काम भावनेने करत गेले, ते या जगात निश्चितपणे परम मोक्षाला प्राप्त झाले.
कर्मणैव हि संसिद्धीमास्थिता जनकादयः ।
लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि ॥ २० ॥
जनकादी ज्ञानी राजे देखील कर्माच्या आचरणानेच परम सिद्धीला प्राप्त झाले आहेत; म्हणून लोकसंग्रहाकडे (लोकांना सन्मार्गावर लावण्याकडे) लक्ष ठेवूनही तू आपले कर्तव्य कर्म करणेच योग्य आहे.
देखें पां जनकादिक । कर्मजात अशेख ।
न सांडिता मोक्षसुख । पावते जाहले ॥ १५२ ॥
हे पहा, जनकासारखे ज्ञानी राजे सर्व कर्मांचा त्याग न करता, त्यांचे योग्य आचरण करतच मोक्षाचे सुख मिळवते झाले.
याकारणे पार्था । होआवी कर्मीं आस्था ।
हे आणिकाही एका अर्था । उपकारेल ॥ १५३ ॥
म्हणूनच हे पार्था, तुझी कर्माच्या ठिकाणी निष्ठा असली पाहिजे; हे आचरण दुसऱ्या एका महत्त्वाच्या कारणासाठीही उपयोगात येईल.
जे आचरता आपणपेयां । देखी लागेल लोका यया ।
तरी चुकेल हा अपाया । प्रसंगेचि ॥ १५४ ॥
कारण जेव्हा तुला श्रेष्ठ कर्म करताना हे लोक पाहतील, तेव्हा तेही तुमचे अनुकरण करतील; त्यामुळे ते सहजच वाईट मार्गाला लागण्यापासून वाचतील.
देखें प्राप्तार्थ जाहले । जे निष्कामता पावले ।
तयाही कर्तव्य असे उरलें । लोकांलागीं ॥ १५५ ॥
हे पहा, ज्यांना परमार्थ प्राप्त झाला आहे आणि जे पूर्णपणे निष्काम झाले आहेत, त्यांना देखील जगाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी कर्तव्य कर्म करावेच लागते.
मार्गीं अंधासरिसा । पुढे देखणाही चाले जैसा ।
अज्ञाना प्रकटावा धर्मु तैसा । आचरोनि ॥ १५६ ॥
ज्याप्रमाणे अंधाला मार्ग दाखवण्यासाठी डोळस माणूस त्याच्या पुढे चालतो, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाने स्वतः आचरण करून अज्ञानांना धर्माचा मार्ग दाखवून दिला पाहिजे.
हां गा ऐसें जरी न कीजे । तरी अज्ञानां काय वोजे ।
तिहीं कवणेपरी जाणिजे । मार्गांते या ॥ १५७ ॥
अहो, जर ज्ञानी माणसानेच असे केले नाही, तर अज्ञानी लोकांचा काय आधार उरणार? त्यांना सन्मार्ग कसा काय समजणार?
यद् यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः ।
स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥ २१ ॥
श्रेष्ठ पुरुष जसे जसे आचरण करतो, इतर सामान्य लोकही तसेच आचरण करतात; तो ज्या गोष्टीला प्रमाण (योग्य) मानतो, सर्व लोक त्याच गोष्टीचे अनुकरण करतात.
एथ वडील जें जें करिती । तया नाम धर्मु ठेविती ।
तेंचि येर अनुष्ठिती । सामान्य सकळ ॥ १५८ ॥
या जगात मोठे आणि श्रेष्ठ लोक जे जे करतात, त्यालाच सामान्य लोक धर्म मानतात आणि सर्व सामान्य लोक त्याच मार्गाचे आचरण करतात.
हें ऐसें असे स्वभावें । म्हणोनि कर्म न संडावे ।
विशेषें आचरावें । लागे संती ॥ १५९ ॥
हा असा जगाचा स्वभाव असल्यामुळे संतांनी कर्माचा त्याग करू नये, उलट त्यांनी विशेष जागरूकतेने विहित कर्मांचे आचरण केले पाहिजे.
न मे पार्थस्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन ।
नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ॥ २२ ॥
हे पार्था, या तिन्ही लोकांत माझे म्हणून कोणतेही कर्तव्य उरलेले नाही; तसेच मला न मिळालेली आणि मिळवण्याजोगी कोणतीही गोष्ट उरलेली नाही, तरीही मी निरंतर कर्म करतच असतो.
आता आणिकाचिया गोठी । तुज सांगो काय किरीटी ।
देखें मीचि इये राहाटी । वर्तत असे ॥ १६० ॥
आता इतरांच्या गोष्टी कशाला सांगू, हे अर्जुना, हे पहा, मी स्वतः देखील याच नियमाने कर्माचे आचरण करत आहे.
काय सांकडे कांही मातें । कीं कवणें एकें आर्तें ।
आचरें मी धर्मातें । म्हणसी जरी ॥ १६१ ॥
जर तू विचारशील की, मला असे काय अडचण आहे किंवा कोणत्या इच्छेपोटी मी या धर्माचे आचरण करत आहे?
तरी पुरतेपणालागी । आणिकु दुसरा नाहीं जगीं ।
ऐसी सामुग्री माझां अंगी । जाणसी तूं ॥ १६२ ॥
तर संपूर्ण विश्वात माझ्याइतका पूर्णकाम दुसरा कोणीही नाही, हे सामर्थ्य माझ्यात आहे हे तू स्वतः उत्तम प्रकारे जाणतोस.
मृत गुरूपुत्र आणिला । तो तुवां पवाडा देखिला ।
तोही मी उगला । कर्मीं वर्ते ॥ १६३ ॥
मेलेल्या गुरुपुत्राला जिवंत करून आणल्याचा माझा पराक्रम तू पाहिलाच आहेस; एवढा सामर्थ्यशाली असूनही मी शांतपणे कर्माचे आचरण करतो.
यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः ।
मम वर्त्मानुवर्तंते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥ २३ ॥
कारण जर मी कधीही आळस न करता कर्मामध्ये प्रवृत्त झालो नाही, तर हे पार्था, सर्व मनुष्य सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुकरण करू लागतील.
परी स्वधर्मीं वर्तें कैसा । साकांक्षु कां होय जैसा ।
तयाचि एका उद्देशा - । लागोनियां ॥ १६४ ॥
परंतु मी माझ्या स्वधर्माचे आचरण अशा प्रकारे करतो, जणू काही मी एखादा सकाम पुरुषच आहे; यामागे केवळ एकच उद्देश असतो,
जे भूतजात सकळ । असे आम्हांचि आधीन केवळ ।
ते न व्हावें बरळ । म्हणोनियां ॥ १६५ ॥
तो म्हणजे, हे सर्व प्राणिमात्र पूर्णपणे माझ्याच अधीन आहेत आणि त्यांनी सन्मार्गापासून भटकून गोंधळात पडू नये.
उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम् ।
संकरस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमाः प्रजाः ॥ २४ ॥
जर मी कर्म केले नाही, तर हे सर्व लोक नष्ट होतील; तसेच मी वर्णसंकराचा कर्ता होईन आणि या सर्व प्रजेचा नाश करण्यास कारणीभूत ठरेन.
आम्ही पूर्णकाम होऊनी । जरी आत्मस्थितीं राहोनी ॥
तरी हे प्रजा कैसेनी । निस्तरेल ॥ १६६ ॥
आम्ही सर्व इच्छा-वासनांपासून मुक्त झालो आहोत म्हणून जर केवळ आत्मस्वरूपातच मग्न (निष्क्रिय) होऊन बसलो, तर मग ही सामान्य जनता कशाच्या आधारे या संसारसागरातून पार पडेल?
इहीं आमुची वास पाहावी । मग वर्तती परी जाणावी ।
ते लौकिक स्थिती अवघी । नासिली होईल ॥ १६७ ॥
या लोकांनी आमच्याकडे पाहावे आणि आमच्या वागण्याचे अनुकरण करावे; परंतु आम्ही कर्म सोडले तर जग कर्माचा त्याग करेल आणि जगाची सर्व व्यवस्था नष्ट होईल.
म्हणोनि समर्थु जो एथें । आथिला सर्वज्ञते ।
तेणे सविशेषें कर्मातें । त्यजावे ना ॥ १६८ ॥
म्हणूनच जो माणूस या जगात सामर्थ्यशाली आणि सर्वज्ञ आहे, त्याने विशेष करून कर्माचा मुळीच त्याग करू नये.
सक्ताः कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वंति भारत ।
कुर्याद्विवांस्तथाऽसक्तश्चिकीर्षुर्लोकलोग्रहम् ॥ २५ ॥
हे भारता (अर्जुना), कर्मामध्ये आसक्त असलेले अज्ञानी लोक ज्याप्रमाणे कर्म करतात, आसक्ती नसलेल्या ज्ञानी पुरुषाने देखील लोककल्याण करण्याची इच्छा धरून अगदी त्याचप्रमाणे कर्म केले पाहिजे.
देखे फळाचिया आशा । आचरे कामुकु जैसा ।
कर्मी बहरु होआवा तैसा । निराशाही ॥ १६९ ॥
हे पहा, फळाची इच्छा ठेवणारा माणूस जसा आवडीने कर्मात गुंतून राहतो, तसाच रस कोणत्याही फलाशेविना असणाऱ्या ज्ञानी माणसानेही कर्माच्या आचरणात दाखवला पाहिजे.
जे पुढतपुढती पार्था । हे सकळ लोकसंस्था ।
रक्षणीय सर्वथा । म्हणऊनियां ॥ १७० ॥
कारण, हे पार्था, या संपूर्ण लोकव्यवस्थेचे रक्षण करणे सर्व प्रकारे आपले परम कर्तव्य आहे.
मार्गाधारे वर्तावें । विश्व हें मोहरें लावावें ।
अलौकिक नोहावें । लोकांप्रति ॥ १७१ ॥
योग्य मार्गाचा आधार घेऊन संपूर्ण जगाला सन्मार्गावर लावावे; सामान्य लोकांसाठी स्वतःला चमत्कारी किंवा जगावेगळे सिद्ध करू नये.
न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसंगिनाम् ।
जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान् युक्तः समाचरन् ॥ २६ ॥
कर्मामध्ये आसक्त असलेल्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीमध्ये ज्ञानी पुरुषाने संभ्रम निर्माण करू नये; तर स्वतः योगी होऊन सर्व कर्मे योग्य प्रकारे करत अज्ञानांकडूनही ती आनंदाने करून घ्यावीत.
जें सायासें स्तन्य सेवी । तें पक्वान्नें केवीं जेवी ।
म्हणोनि बाळका जैशीं नेदावीं । धनुर्धरा ॥ १७२ ॥
जे बाळ केवळ कष्टाने आईचे दूध पिऊन जगते, त्याला जर एकदम पक्वान्न दिले तर ते कसे काय पचवू शकेल? म्हणूनच हे धनुर्धरा, लहान मुलाला पक्वान्न देऊ नये.
तैशी कर्मीं जया अयोग्यता । तयाप्रति नैष्कर्म्यता ।
न प्रगटावी खेळतां । आदिकरूनी ॥ १७३ ॥
त्याप्रमाणे ज्यांची कर्माशिवाय इतर गोष्टीत गती नाही, त्यांच्यासमोर सहजपणे देखील कर्मशून्यतेच्या (ज्ञानाच्या) गप्पा मारू नयेत.
तेथें सत्क्रियाचि लावावी । तेचि एकी प्रशंसावी ।
नैष्कर्मींही दावावी । आचरोनि ॥ १७४ ॥
अशा लोकांना चांगल्या कर्मातच प्रवृत्त करावे, त्या चांगल्या कर्मांचीच स्तुती करावी आणि आपण स्वतः आचरण करून त्यांना तोच मार्ग दाखवावा.
तया लोकसंग्रहालागीं । वर्ततां कर्मसंगी ।
तो कर्मबंधु आंगी । वाजेलना ॥ १७५ ॥
लोकांच्या कल्याणासाठी अशा प्रकारे कर्मात वावरताना, कर्माचे कोणतेही बंधन ज्ञानी माणसाला कधीही बाधत नाही.
जैसी बहुरूपियाची रावो राणी । स्त्रीपुरुषभावो नाही मनीं ।
परी लोकसंपादणी । तैशीच करिती ॥ १७६ ॥
ज्याप्रमाणे बहुरूप्याचे सोंग घेणाऱ्या स्त्री-पुरुषांच्या मनात खरा पती-पत्नीचा भाव नसतो, पण ते लोकांच्या मनोरंजनासाठी तसे हुबेहूब सोंग वठवतात, त्याचप्रमाणे ज्ञानी माणसाने जगावे.
प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः ।
अहंकारविमूढात्मा कर्ताहं इति मन्यते ॥ २७ ॥
सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीच्या गुणांमुळेच घडत असतात; परंतु अहंकाराने मोहित झालेला मूर्ख मनुष्य 'मीच कर्ता आहे' असे मानतो.
देखें पुढिलाचें वोझें । जरी आपुला माथां घेईजे ।
तरी सांगे कां न दाटिजे । धनुर्धरा ॥ १७७ ॥
हे पहा धनुर्धरा, दुसऱ्याचे ओझे जर आपण स्वतःच्या डोक्यावर घेतले, तर आपण त्या वजनाखाली दाबले जाणार नाही का?
तैसी शुभाशुभें कर्में । जिये निफजति प्रकृतिधर्में ।
तियें मूर्ख मतिभ्रमें । मी कर्ता म्हणे ॥ १७८ ॥
त्याप्रमाणे प्रकृतीच्या नियमांनुसार घडणाऱ्या चांगल्या-वाईट कर्मांना भ्रमिष्ट झालेला मूर्ख मनुष्य स्वतःचे मानून 'मीच हे केले' असे म्हणतो.
ऐसा अहंकाराधिरूढ । एकदेशी मूढ ।
तया हा परमार्थ गूढ । प्रगटावा ना ॥ १७९ ॥
अशा अहंकाराने पछाडलेल्या आणि संकुचित बुद्धीच्या मूर्ख माणसासमोर हे अत्यंत गुह्य तत्त्वज्ञान कधीही सांगू नये.
हें असो प्रस्तुत । सांगिजेल तुज हित ।
तें अर्जुना देऊनि चित्त । अवधारी पां ॥ १८० ॥
हे राहू द्या; आता प्रस्तुत प्रसंगाला धरून जे तुझ्या हिताचे आहे, ते हे अर्जुना, तू मन लावून ऐक.
तत्ववित् तु महाबाहो गुणकर्मविभागयोः ।
गुणाः गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते ॥ २८ ॥
परंतु, हे महाबाहो अर्जुना, गुण विभाग आणि कर्म विभाग यांच्या तत्त्वाला जाणणारा ज्ञानी पुरुष, सर्व इंद्रिये (गुण) आपापल्या विषयात (गुणांत) वावरत आहेत असे मानून, त्या कर्मांमध्ये कधीही आसक्त होत नाही.
जे तत्वज्ञियांचां ठायीं । तो प्रकृतिभावो नाहीं ।
जेथ कर्मजात पाहीं । निपजत असे ॥ १८१ ॥
कारण ज्यांच्या अंगी आत्मज्ञान बाणले आहे, त्यांच्या ठिकाणी प्रकृतीचा ताबा उरत नाही; जिथून सर्व कर्मे निर्माण होतात.
ते देहाभिमानु सांडुनी । गुणकर्में वोलांडुनी ।
साक्षिभूत होऊनी । वर्तती देहीं ॥ १८२ ॥
ते देहाचा अभिमान सोडून, गुण आणि कर्मांच्या पलीकडे जाऊन, या शरीरात केवळ साक्षीदार म्हणून वावरतात.
म्हणूनि शरीरी जरी होती । तरी कर्मबंधा नाकळती ।
जैसा कां भूतचेष्टा गभस्ती । घेपवेना ॥ १८३ ॥
म्हणूनच ते जरी शरीरात राहत असले तरी कर्माच्या बंधनात अडकत नाहीत; ज्याप्रमाणे माणसाच्या सावलीच्या हालचालींमुळे प्रत्यक्ष सूर्य कधी बांधला जात नाही.
प्रकृतेर्गुणसंमूढाः सज्जन्ते गुणकर्मसु ।
तानकृत्स्नविदो मन्दान् कृत्स्नविन् न विचालयेत् ॥ २९ ॥
प्रकृतीच्या गुणांनी अत्यंत मोहित झालेले लोक गुण आणि कर्मांमध्ये आसक्त होतात; अशा अपूर्ण ज्ञान असणाऱ्या अज्ञानी मंदबुद्धी लोकांना संपूर्ण ज्ञानी पुरुषाने विचलित करू नये.
एथ कर्मी तोच लिंपे । जो गुणसंभ्रमें घेपे ।
प्रकृतिचेनि आटोपें । वर्ततु असे ॥ १८४ ॥
या जगात कर्माने तोच माणूस बांधला जातो, जो गुणांच्या भ्रमात अडकतो आणि प्रकृतीच्या नियंत्रणाखाली राहून वागतो.
इंद्रियें गुणाधारें । राहाटती निजव्यापारें ।
तें परकर्म बलात्कारें । आपादी जो ॥ १८५ ॥
इंद्रिये आपल्या नैसर्गिक धर्मानुसार आपापल्या विषयांत वावरत असतात; परंतु जो अज्ञानाने ती कर्मे बळजबरीने स्वतःची मानून त्यावर मालकी हक्क सांगतो, तो बंधनात पडतो.
मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याद्यात्मचेतसा ।
निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगत्जवरः ॥ ३० ॥
म्हणून तू आपल्या विवेकयुक्त अंतःकरणाने सर्व कर्मे मला अर्पण करून, आशा आणि ममत्व सोडून, संताप विसरून युद्ध कर.
परी उचिते कर्में आघवीं । तुवा आचरोनि मज अर्पावीं ।
परी चित्तवृत्ती न्यासावी । आत्मरूपीं ॥ १८६ ॥
म्हणून तू सर्व योग्य कर्तव्य कर्मे स्वतः करून ती मला अर्पण कर आणि आपली चित्तवृत्ती नेहमी आत्मस्वरूपात स्थिर ठेव.
हें कर्म मी कर्ता । कां आचरेन या अर्था ।
ऐसा अभिमानु झणें चित्ता । रिगो देसी ॥ १८७ ॥
'हे कर्म माझे आहे, मी याचा कर्ता आहे' किंवा 'मी हे कशासाठी करू?' असा अहंकार तू तुझ्या मनात चुकूनही येऊ देऊ नकोस.
तुवां शरीरपरा नोहावें । कामनाजात सांडावें ।
मग अवसरोचित भोगावे । भोग सकळ ॥ १८८ ॥
तू शरीराचा अति लाड करू नकोस, सर्व वासनांचा त्याग कर आणि मग प्रसंगाने मिळणारे भोग सहजपणे भोगत राहा.
आतां कोदंड घेऊनि हातीं । आरूढ पां इये रथीं ।
देईं आलिंगन वीरवृत्ती । समाधानें ॥ १८९ ॥
आता हातात धनुष्य घे आणि या रथावर स्वार हो; आणि अत्यंत समाधानाने या वीरवृत्तीचा स्वीकार कर.
जगीं कीर्ति रूढवीं । स्वधर्माचा मानु वाढवीं ॥
मज भारापासोनि सोडवीं । मेदिनी हे ॥ १९० ॥
(भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात) या जगात आपल्या पराक्रमाची व उत्तम आचरणाची कीर्ती पसरव, स्वधर्माचा गौरव वाढव आणि या पृथ्वीला पाप व दुष्टांच्या मोठ्या भारापासून मुक्त कर.
आतां पार्था निःशंकु होई । या संग्रामा चित्त देईं ।
एथ हें वांचूनि कांही । बोलों नये ॥ १९१ ॥
आता हे पार्था, मनातील सर्व शंका काढून टाक, केवळ या युद्धावर लक्ष केंद्रित कर; येथे याशिवाय दुसरे काहीही बोलणे योग्य नाही.
ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवः ।
श्रद्धावन्तोऽनसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः ॥ ३१ ॥
जे मनुष्य दोष न ठेवता, श्रद्धावान होऊन माझ्या या मताचे नेहमी पालन करतात, ते देखील सर्व कर्मांच्या बंधनातून मुक्त होतात.
हें माझे निष्पक्ष मत जे लोक अत्यंत आदराने स्वीकारतात आणि श्रद्धेने याचे आचरण करतात, हे धनुर्धरा,
तेही सकळ कर्मी वर्ततु । जाण पां कर्मरहितु ।
म्हणोनि हें निश्चितु । करणीय गा ॥ १९३ ॥
ते देखील सर्व कर्मे करत असूनही कर्माच्या बंधनापासून पूर्णपणे मुक्त होतात; म्हणूनच या कर्माचे आचरण करणे अत्यंत आवश्यक आहे.
ये त्वेतत्दभ्यसूयंतो नानुतिष्ठन्ति मे मतम् ।
सर्वज्ञानविमूढांस्तान् विद्धि नष्टानचेतसः ॥ ३२ ॥
परंतु जे लोक माझ्या या उपदेशावर दोषारोप करतात आणि याचे आचरण करत नाहीत, त्यांना तू सर्व ज्ञानामध्ये मोहित झालेले, विवेकहीन आणि नष्ट झालेलेच समज.
नातरी प्रकृतिमंतु होऊनणी । इंद्रियां लळा देऊनणी ।
जे हें माझे मत अव्हेरुनी । ओसंडिती ॥ १९४ ॥
किंवा जे केवळ प्रकृतीच्या आहारी जाऊन आणि इंद्रियांचे चोचले पुरवून, माझ्या या उपदेशाचा तिरस्कार करून तो नाकारतात,
जे सामान्यत्वें लेखिती । अवज्ञा करूनि देखिती ।
कां हा अर्थवादु म्हणती । वाचाळपणें ॥ १९५ ॥
जे या उपदेशाला अतिशय सामान्य समजतात, त्याची टवाळी करतात किंवा बडबड करून हा केवळ सांगायचा मार्ग आहे असे म्हणतात,
ते मोहमदिरा भ्रमले । विषयविखें घारले ।
अज्ञानपंकी बुडाले । निभ्रांत मानीं ॥ १९६ ॥
ते मोहाच्या मद्याने भ्रमिष्ट झाले आहेत, विषयांच्या विषाने ग्रस्त झाले आहेत आणि अज्ञानाच्या चिखलात बुडाले आहेत, हे तू निश्चित समज.
देखें शवाचां हातीं दिधलें । जैसे कां रत्न वायां गेलें ।
नातरी जात्यंधा पाहलें । प्रमाण नोहे ॥ १९७ ॥
जसे एखाद्या प्रेताच्या हातात दिलेले अमूल्य रत्न वाया जाते, किंवा जन्मांधासाठी सूर्य उगवल्याचे काहीच महत्त्व नसते,
कां चंद्राचा उदयो जैसा । उपयोगा नवचे वायसा ।
मूर्खा विवेकु हा तैसा । रुचेल ना ॥ १९८ ॥
किंवा चंद्राचा उदय जसा कावळ्याला निरुपयोगी ठरतो, त्याचप्रमाणे मूर्ख माणसाला हा विवेकाचा मार्ग कधीही आवडणार नाही.
तैसे ते पार्था । जे विमुख या परमार्था ।
तयांसी संभाषण सर्वथा । करावे ना ॥ १९९ ॥
म्हणूनच, हे पार्था, जे लोक या परमार्थापासून विमुख आहेत, त्यांच्याशी कधीही संभाषण करू नये.
म्हणोनि ते न मानिती । आणि निंदाही करूं लागती ।
सांगे पतंग काय साहती । प्रकाशातें ॥ २०० ॥
ते लोक हा मार्ग मानत तर नाहीतच, उलट त्याची निंदा करतात; पण पतंग कधी दिव्याच्या प्रकाशाला सहन करू शकतो का?
पतंगा दीपीं आलिंगन । तेथ त्यासी अचूक मरण ।
तेवीं विषयाचरण । आत्मघाता ॥ २०१ ॥
पतंगाने दिव्याला मिठी मारली की त्याचा मृत्यू ठरलेलाच असतो; त्याप्रमाणे केवळ विषयांचे आचरण करणे हा आत्मघातच आहे.
सदृश्यं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि ।
प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति ॥ ३३ ॥
सर्व प्राणिमात्र आपल्या प्रकृतीला (स्वभावाला) अनुसरूनच वागतात; अगदी ज्ञानी पुरुष देखील आपल्या प्रकृतीनुसारच वागतो; मग अशा वेळी इंद्रियांच्या निग्रहाचा काय उपयोग होणार?
म्हणोनि इंद्रिये एकें । जाणतेनि पुरुखें ।
लाळावीं ना कौतुकें । आदिकरूनि ॥ २०२ ॥
म्हणूनच समजूतदार माणसाने कधीही आपल्या इंद्रियांचे लाड पुरवू नयेत.
हां गा सर्पेंसी खेळों येईल । कीं व्याघ्रसंसर्ग सिद्धी जाईल ।
सांगे हाळाहाळ जिरेल । सेविलिया ॥ २०३ ॥
अहो, सापाशी खेळता येईल किंवा वाघाशी मैत्री करणे शक्य होईल, पण कधी भयंकर विष पिल्यावर ते पचवता येईल का?
देखें खेळतां अग्नि लागला । मग तो न सांवरे जैसा उधवला ।
तैसा इंद्रिया लळा दिधला । भला नोहे ॥ २०४ ॥
जसे खेळता खेळता अचानक वणवा पेटला की तो शांत करणे अशक्य होते, त्याप्रमाणे इंद्रियांचे लाड पुरवणे कधीही हिताचे नसते.
एर्हवीं तरी अर्जुना । या शरीरा पराधीना ।
कां नाना भोगरचना । मेळवावी ॥载 ॥
एरवी देखील, हे अर्जुना, एका दिवशी नष्ट होणाऱ्या या पराधीन शरीरासाठी नानाविध भोगांची सोय कशासाठी करायची?
आपण सायासेंकरूनि बहुतें । सकळहि समृद्धिजातें ।
उदोअस्तु या देहातें । प्रतिपाळावे कां ॥ २०६ ॥
आपण स्वतः अनेक कष्ट करून, सर्व संपत्ती मिळवून, शेवटी नाश पावणाऱ्या या शरीराचे लाड का करावेत?
सर्वस्वें शिणोनि एथें । अर्जवावीं संपत्तिजातें ।
तेणें स्वधर्मु सांडुनी देहातें । पोखावें काई ॥ २०७ ॥
आपले सर्वस्व पणाला लावून, जीवापाड कष्ट करून मिळालेल्या संपत्तीने स्वधर्म सोडून केवळ शरीराचे पोषण करावे का?
मग हें तंव पांचमेळावा । शेखीं अनुसरेल पंचत्वा ।
ते वेळीं केला कें गिंवसावा । शीणु आपुला ॥ २०८ ॥
शेवटी हे पाच तत्त्वांचे बनलेले शरीर एक दिवस मातीतच मिसळणार आहे; मग त्यासाठी आपण घेतलेले सर्व कष्ट आणि श्रम वाया गेले, तर ते कुठे शोधायचे?
म्हणूनि केवळ देहभरण । ते जाणें उघडी नागवण ।
यालागी एथ अंतःकरण । देयावें ना ॥ २०९ ॥
म्हणूनच केवळ शरीराचे लाड करणे ही स्वतःचीच फसवणूक आहे; यासाठी या केवळ शारीरिक सुखात आपले मन कधीही गुंतवू नये.
इंद्रियस्येंद्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ ।
तौह्यस्य परिपंथिनौ ॥ ३४ ॥
प्रत्येक इंद्रियाच्या आपापल्या विषयात राग (आसक्ती) आणि द्वेष अनुकूल-प्रतिकूलतेनुसार स्थिर झालेले असतात; माणसाने या दोघांच्या आहारी जाऊ नये, कारण हेच त्याचे खरे शत्रू आहेत.
एर्हवीं इंद्रियाचियां अर्था - । सारिखा विषयो पोखितां ।
संतोषु कीर चित्ता । आपजेल ॥ २१० ॥
एरवी इंद्रियांना हवे असणारे विषय पुरवले, तर मनात क्षणिक आनंद नक्कीच निर्माण होईल,
परी तो संवचोराचा संगु । जैसा नावेक स्वस्थु ।
जंव नगराचा प्रांतु । सांडिजेना ॥ २११ ॥
परंतु तो आनंद म्हणजे एखाद्या दरोडेखोराची संगत धरण्यासारखा आहे; जोपर्यंत गावची वेस ओलांडत नाही, तोपर्यंतच तो आपल्याला सुरक्षित वाटतो.
बापा विषाची मधुरता । झणे आवडी उपजे चित्ता ।
परी तो परिणाम विचारितां । प्राणु हरी ॥ २१२ ॥
हे अर्जुना, विषाची गोडी मनाला तात्पुरती आवडेल, परंतु त्याचा अंतिम परिणाम हा जीवाचा नाश करणाराच असतो.
देखें इंद्रियीं कामु असे । तो लावी सुखदुराशे ।
जैसा गळीं मीनु आमिषें । भुलविजे गा ॥ २१३ ॥
हे पहा, इंद्रियांमध्ये असणारी वासना आपल्याला सुखाची खोटी आशा दाखवते; ज्याप्रमाणे माशाची शिकार करण्यासाठी गळाला लावलेल्या अमिषाला पाहून तो मासा भुलतो,
परी तयामाजि गळु आहे । जो प्राणातें घेऊनि जाये ।
तो जैसा ठाउवा नोहे । झांकलेपणें ॥ २१४ ॥
परंतु त्या अमिषाच्या मागे लपवलेला प्राणघातक गळ त्या माशाला दिसत नाही,
तैसें अभिलाषें येणें कीजेल । जरी विषयाची आशा कीजेल ।
तरी वरपडा होईजेल । क्रोधानळा ॥ २१५ ॥
त्याचप्रमाणे जर तू या विषयांच्या आशेमागे धावशील, तर नक्कीच क्रोधाच्या अग्नीमध्ये भस्म होऊन जाशील.
जैसा कवळोनियां पारधी । घातेचिये संधी ।
आणि मृगातें बुद्धीं । साधावया ॥ २१६ ॥
ज्याप्रमाणे पारधी सावजाला फसवण्यासाठी शिकारीचे जाळे पसरवून योग्य संधीची वाट पाहत असतो,
एथ तैसीची परी आहे । म्हणूनि संगु हा तुज नोहे ।
पार्था दोन्ही कामक्रोध हे । घातुक जाणें ॥ २१७ ॥
येथेही अगदी तशीच परिस्थिती आहे; म्हणूनच तू या विषयांची संगत धरू नकोस. हे पार्था, काम आणि क्रोध हे दोन्ही तुझे परम शत्रू आहेत.
म्हणऊनि हा आश्रयोचि न करावा । मनींही आठवो न धरावा ।
एकु निजवृत्तीचा वोलावा । नासों नेदीं ॥ २१८ ॥
म्हणूनच या काम-क्रोधाचा कधीही आश्रय घेऊ नये, मनात त्यांची आठवण देखील येऊ देऊ नये आणि आपल्या आत्मस्वरूपाचा आनंद कधीही नष्ट होऊ देऊ नये.
श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् ।
स्वधर्मे निधनम् श्रेयः परधर्मो भयावहः ॥ ३५ ॥
उत्तम प्रकारे आचरण केलेल्या परधर्मापेक्षा गुणांनी कमी वाटणारा आपला स्वधर्म अधिक श्रेयस्कर आहे; स्वधर्माचे पालन करताना मृत्यू आला तरी तो कल्याणकारी आहे, परंतु परधर्माचे आचरण करणे अत्यंत भयावह आहे.
अगा स्वधर्मु हा आपुला । जरि कां कठिणु जाहला ।
तरी हाचि अनुष्ठिला । भला देखें ॥ २१९ ॥
अहो, आपला स्वधर्म आचरण करायला जरी कठीण वाटला, तरी त्याचेच पालन करणे अत्यंत हिताचे आहे.
येरू आचारु जो परावा । तो देखतां कीर बरवा ।
परि आचरतेनि आचरावा । आपुलाचि ॥ २२० ॥
दुसऱ्याचा धर्म पाहायला जरी चांगला आणि सोपा वाटला, तरी प्रत्येकाने आपापल्या स्वधर्माचेच आचरण केले पाहिजे.
सांगे शूद्रघरीं आघवीं । पक्वाने आहाति बरवीं ।
तीं द्विजें केवीं सेवावीं । दुर्बळु जरी जाहला ॥ २२१ ॥
मला सांग, जरी एखाद्या शूद्राच्या घरात अनेक उत्तम पक्वान्ने असली, तरी एखादा ब्राह्मण गरीब झाला म्हणून त्याने ती पक्वान्ने खाणे योग्य ठरेल का?
हें अनुचित कैसेनि कीजे । अप्राप्य केवीं इच्छिजे ।
अथवा इच्छिलेंही पाविजे । विचारीं पां ॥ २२२ ॥
हे अयोग्य कर्म कसे काय करता येईल? जे आपल्याला मिळण्याजोगे नाही त्याची इच्छा का करावी? आणि इच्छा केली तरी ते पचेल का, याचा तूच विचार कर.
तरी लोकांचीं धवळारें । देखोनियां मनोहरें ।
असतीं आपुलीं तणारें । मोडावीं केवीं ॥ २२३ ॥
इतरांचे सुंदर आणि मोठे महाल पाहून आपण राहतो ती आपली गरिबाची झोपडी मोडून टाकावी का?
हें असो वनिता आपुली । कुरुप जरी जाहली ।
तरी भोगितां तेचि भली । जियापरी ॥ २२४ ॥
हे राहू द्या; स्वतःची पत्नी जरी रूपवान नसली, तरी तिच्याशी एकनिष्ठ राहणे हेच गृहस्थासाठी श्रेष्ठ असते,
तेवीं आवडे सांकडु । आचरता जरी दुवाडु ।
तरी स्वधर्मचि सुरवाडु । पारत्रिकीचा ॥ २२५ ॥
त्याप्रमाणे स्वधर्माचे आचरण करताना कितीही त्रास झाला किंवा तो कठीण वाटला, तरी परलोकात कल्याण करण्यासाठी केवळ स्वधर्मच उपयोगी पडतो.
हां गा साकर आणि दूध । हें गौल्य कीर प्रसिद्ध ।
परी कृमीदोषीं विरुद्ध । घेपें केवीं ॥ २२६ ॥
अहो, दूध आणि साखर हे अत्यंत गोड आणि पौष्टिक पदार्थ आहेत हे सर्वांना माहीत आहे; परंतु ज्याला कफाचा त्रास आहे, त्याने ते घेणे कसे योग्य ठरेल?
ऐसेनिही जरी सेविजेल । तरी ते आळुकीची उरेल ।
जे तें परिणामीं पथ्य नव्हेल । धनुर्धरा ॥ २२७ ॥
आणि तरीही हट्टाने जर त्याने ते घेतले, तर त्यामुळे त्याचा आजार वाढून जीवावर बेतेल; कारण शेवटी ते त्याच्या आरोग्यासाठी अपथ्यकारकच ठरणार आहे, हे धनुर्धरा.
म्हणोनि आणिकांसी जे विहीत । आणि आपणपेयां अनुचित ।
तें नाचरावे जरी हित । विचारिजे ॥ २२८ ॥
म्हणूनच जे इतरांसाठी योग्य आहे परंतु स्वतःसाठी अयोग्य आहे, त्याचे आचरण कधीही करू नये, जर आपण स्वतःचे हित इच्छित असू.
या स्वधर्मातें अनुष्ठितां । वेचु होईल जीविता ।
तोहि निका वर उभयतां । दिसतसे ॥ २२९ ॥
या स्वधर्माचे आचरण करताना जरी प्राणांचा अंत झाला, तरी ते मृत्यू देखील या लोक आणि परलोकात परम कल्याणाचेच ठरेल.
ऐसें समस्तसुरशिरोमणी । बोलिले जेथ श्रीशार्ङगपाणी ।
तेथ अर्जुन म्हणे विनवणी । असे देवा ॥ २३० ॥
जेव्हा देवाधिदेव श्रीकृष्णांनी हे गुह्य सांगितले, तेव्हा अर्जुन अत्यंत नम्रतेने म्हणाला, हे देवा, माझी एक विनंती आहे.
हें जें तुम्हीं सांगितले । तें सकळ कीर म्यां परिसलें ।
परि पुसेन कांही आपुले । अपेक्षित ॥ २३१ ॥
तुम्ही जे काही मला सांगितले ते मी नीटपणे ऐकले आहे; परंतु मला पडलेला एक प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो.
अर्जुन उवाच: अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरूषः । |
अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः ॥ ३६ ॥
अर्जुन म्हणाला, हे वार्ष्णेया (कृष्णा), मग असा कोणता बलवान घटक आहे, ज्याच्या प्रेरणेने हा मनुष्य स्वतःची इच्छा नसताना देखील बळजबरीने लावल्यासारखा पापाचे आचरण करतो?
तरी देवा हें ऐसें कैसें । जे ज्ञानियांचीही स्थितीही भ्रंशे ।
मार्ग सांडुनि अनारिसे । चालत देखों ॥ २३२ ॥
हे देवा, हे असे कसे घडते की ज्ञानी माणसांची देखील बुद्धी भ्रष्ट होते आणि ते सन्मार्ग सोडून वाईट मार्गाला लागलेले दिसतात?
सर्वज्ञुही जे होती । हे उपायही जाणती ।
तेही परधर्में व्यभिचरति । कवणें गुणें ॥ २३३ ॥
जे अत्यंत विद्वान आहेत आणि सर्व नियम व उपाय जाणतात, ते देखील कोणत्या कारणामुळे परधर्माचे आचरण करून भ्रष्ट होतात?
बीजा आणि भुसा । अंधु निवाडु नेणे जैसा ।
नावेक देखणाही तैसा । बरळे कां पां ॥ २३४ ॥
धान्य आणि भुसा यातील फरक जसा आंधळ्याला कळत नाही, तसाच डोळस माणूस देखील कधी कधी भ्रमिष्टासारखा का वागतो?
जे असता संगु सांडिती । तेचि संसर्गु करिता न धाती ।
वनवासीही सेविती । जनपदातें ॥ २३५ ॥
जे संसाराचा त्याग करून वनात निघून जातात, तेच पुन्हा लोकांच्या संसर्गात येण्यास उत्सुक असतात आणि वन सोडून मानवी वस्तीत राहू लागतात.
आपण तरी लपती । सर्वस्वें पाप चुकविती ।
परी बलात्कारे सुइजती । तयाचिमाजी ॥ २३६ ॥
ते पापापासून स्वतःला वाचवण्यासाठी लपून राहतात, परंतु तरीही त्यांना बळजबरीने त्याच पापात ओढले जाते.
जयांची जीवें घेती विवसी । तेचि जडोनि ठाके जीवेंसीं ।
चुकविती ते गिंवसी । तयातेंचि ॥ २३७ ॥
ज्या पापाचा ते मनापासून वीट मानतात, तेच पाप त्यांच्या जीवाला चिकटून राहते; ते ज्या गोष्टी टाळू पाहतात, तीच गोष्ट त्यांच्या मागे लागते.
ऐस बलात्कारु एकु दिसे । तो कवणाचा एथ आग्रहो असे ।
हें बोलावे हृषिकेशें । पार्थु म्हणे ॥ २३८ ॥
असा हा जो एक बळजबरी करणारा अदृश्य प्रभाव दिसतो, तो नेमका कोणाचा हट्ट आहे? हे हृषिकेशा श्रीकृष्ण, आपण मला सांगावे.
श्रीभगवानुवाच: काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः ।
महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम् ॥ ३७ ॥
श्रीभगवान म्हणाले, हा रजोगुणापासून उत्पन्न झालेला काम (वासना) आहे आणि हाच क्रोध आहे; हा कधीही तृप्त न होणारा (महान खाणारा) आणि अत्यंत पापी आहे; यालाच तू या जगातील मुख्य शत्रू समज.
तंव हृदयकमळारामु । जो योगियांचा निष्कामकामु ।
तो म्हणतसे पुरुषोत्तमु । सांगेन आइक ॥ २३९ ॥
तेव्हा योग्यांचे आराध्य आणि भक्तांचे कैवारी असणारे पुरुषोत्तम श्रीकृष्ण म्हणाले, मी तुला याचे मूळ कारण सांगतो, ऐक.
तरी हे काम क्रोधु पाहीं । जयांते कृपेची साठवण नाहीं ।
हें कृतांताचां ठायी । मानिजती ॥ २४० ॥
हा काम आणि क्रोध म्हणजे प्रत्यक्ष यमराजाचेच रूप आहेत, यांच्या ठिकाणी दयेचा लवलेशही नसतो, हे तू समज.
हे ज्ञाननिधीचे भुजंग । विषयदरांचे वाघ ।
भजनमार्गीचे मांग । मारक जे ॥ २४१ ॥
हे ज्ञानाच्या भांडाराचे रक्षण करणारे विषारी साप आहेत, विषयांच्या दरीतील हिंस्त्र वाघ आहेत आणि भक्तीच्या मार्गात अडथळा आणणारे मारेकरी आहेत.
हे देहदुर्गीचे धोंड । इंद्रियग्रामीचे कोंड ।
यांचे व्यामोहादिक बंड । जगामाजि ॥ २४२ ॥
हे आपल्या शरीराच्या किल्ल्यातील मोठे दगड आहेत, इंद्रियरूपी गावाला कोंडून ठेवणारे पहारेकरी आहेत आणि यांच्या मोहाचे साम्राज्य संपूर्ण जगात पसरले आहे.
हे रजोगुण मानसाचे । समूळ आसुरियेचे ।
धायपण ययांचे । अविद्या केले ॥ २४३ ॥
हे मनातील रजोगुणापासून निर्माण होतात, असुर प्रवृत्तीचे मूळ आहेत आणि अज्ञानानेच यांचे संगोपन केले आहे.
हे रजाचे कीर जाहले । परी तमासी पढियंते भले ।
तेणें निजपद यां दिधले । प्रमादमोह ॥ २४४ ॥
जरी हे रजोगुणापासून जन्माला आले असले, तरी तमोगुणाला ते अत्यंत प्रिय आहेत; आणि तमोगुणानेच त्यांना प्रमाद आणि मोह ही आपली पदे बहाल केली आहेत.
हे मृत्यूचां नगरीं । मानिजति निकियापरी ।
जे जीविताचे वैरी । म्हणऊनियां ॥ २४५ ॥
यमराजाच्या दरबारात यांचा मोठा आदर केला जातो, कारण हे मनुष्याच्या अध्यात्मिक जीवनाचे सर्वात मोठे वैरी आहेत.
जयांसि भुकेलियां आमिषा । हें विश्व न पुरेचि घांसा ।
कुळवाडी यांची आशा । चाळित असे ॥ २४६ ॥
जेव्हा यांना भूक लागते, तेव्हा संपूर्ण विश्वाचा घास देखील यांना अपुरा पडतो; संपूर्ण विश्वाला नाचवणारी आशा देखील यांच्याच अधीन राहून काम करते.
कौतुकें कवळितां मुठीं । जिये चौदा भुवनें थेंकुटीं ।
तें भ्रांति तिये धाकुटी । वाल्हीदुल्ही ॥ २४७ ॥
ज्यांच्या मुठीत चौदा भुवने देखील अगदी लहान वाटतात, ती भ्रांति (भ्रम) देखील यांच्यासमोर अगदी क्षुद्र भासते.
जे लोकत्रयाचें भातुके । खेळताचि खाय कवतिकें ।
तिच्या दासीपणाचेनि बिकें । तृष्णा जिये ॥ २४८ ॥
जी तृष्णा खेळता खेळता तिन्ही लोकांचे खेळणे करून सहज गिळून टाकते, ती तृष्णा देखील यांच्या दासीपणाच्या बळावर जिवंत राहते.
हें असो मोहे मानिजे । यांते अहंकार घेपे दीजे ।
जेणे जग आपुलेनि भोजें । नाचवित असे ॥ २४९ ॥
हे राहू द्या; मोह यांच्या सांगण्यावरून काम करतो आणि अहंकार यांच्याकडूनच बळ मिळवतो; आणि याच बळावर हा अहंकार संपूर्ण जगाला आपल्या तालावर नाचवतो.
जेणें सत्याचा भोकसा काढिला । मग अकृत्य तृणकुटा भरिला ।
तो दंभु रूढविला । जगीं इहीं ॥ २५० ॥
ज्यांनी मानवी मनातील सत्य काढून टाकले आणि त्या जागी वाईट कर्मांचा कचरा भरला, अशा दंभाला (ढोंगीपणाला) यांनीच या जगात मोठे केले.
साध्वी शांती नागवली । मग माया मांगी शृंगारिली ।
तियेकरवी विटाळविली । साधुवृंदे ॥ २५१ ॥
ज्यांनी मनातील सात्त्विक शांतीचा नाश केला आणि मायावी गोष्टींचा शृंगार करून संतांच्या मार्गात विघ्न आणले,
इहीं विवेकाची त्राय फेडिली । वैराग्याची खाली काढिली ।
जितया मान मोडिली । उपशमाची ॥ २५२ ॥
ज्यांनी विवेकाचा धीर खचवला, वैराग्याची वस्त्रे खेचून घेतली आणि जिवंतपणीच मनाच्या समाधानाचा गळा आवळला,
इहीं संतोषवन खांडिले । धैर्यदुर्ग पाडिले ।
आनंदरोप सांडिले । उपडूनियां ॥ २५३ ॥
ज्यांनी मानवी मनातील समाधानाचे वन तोडून टाकले, धैर्याचा किल्ला पाडून टाकला आणि आनंदाची लहान रोपे मुळासकट उपटून टाकली,
इहीं बोधाची रोपे लुंचिली । सुखाची लिपी पुसली ।
जिव्हारीं आगी सूदली । तापत्रयाची ॥ २५४ ॥
ज्यांनी आत्मज्ञानाची रोपे नष्ट केली, सुखाचे अस्तित्व पुसून टाकले आणि प्राणिमात्रांच्या हृदयात त्रिविध तापांची (दुःखाची) आग लावली,
हे आंगा तव घडले । जीवींचि आथी जडले ।
परी नातुडती गिंवसले । ब्रह्मादिकां ॥ २५५ ॥
हे काम-क्रोध आपल्या शरीराशी आणि प्राणांशी एवढे एकरूप झाले आहेत की, ब्रह्मदेवासारख्या मोठ्या देवांनाही त्यांना शोधून नष्ट करणे कठीण जाते.
हें चैतन्याचे शेजारी । वसती ज्ञानाचां एका हारीं ।
म्हणोनि प्रवर्तले महामारी । सांवरती ना ॥ २५६ ॥
हे आपल्या चैतन्याच्या अगदी शेजारी राहतात आणि ज्ञानाच्याच बाजूला वास करतात; म्हणूनच हे जेव्हा पेटून उठतात, तेव्हा यांना आवरणे अत्यंत कठीण होते.
हें जळेंवीण बुडविती । आगीविण जाळिती ।
न बोलता कवळिती । प्राणियांते ॥ २५७ ॥
हे पाण्याशिवाय बुडवतात, अग्नीशिवाय जिवंत जाळतात आणि कोणताही शब्द न बोलता मानवाचे प्राण हरण करतात.
हे शस्त्रेविण साधिती । दोरेविण बांधिती ।
ज्ञानियासी तरी वधिती । पैज घेऊनि ॥ २५८ ॥
हे शस्त्राशिवाय घाव घालतात, दोरीशिवाय बांधून ठेवतात आणि पैज लावून मोठ्या ज्ञानी पुरुषांचे देखील पतन घडवून आणतात.
चिखलेंवीण रोविती । पाशिकेंवीण गोंविती ।
हे कणाजोगे न होती । आंतौटेपणें ॥ २५९ ॥
हे चिखलाशिवाय माणसाला गुंतवून ठेवतात, पाशाशिवाय अडकवतात आणि अत्यंत कपटी असल्यामुळे कोणाच्याही हाताला लागत नाहीत.
धूमेनाऽव्रियते वन्हिर्यथादर्शो मलेन च ।
येथोल्बेनावृत्तो गर्भस्तथा तेनेदमावृतम् ॥ ३८ ॥
ज्याप्रमाणे धुराने अग्नी झाकला जातो, धुळीने आरसा अस्पष्ट होतो आणि वारेने (गंभीर त्वचेने) गर्भ वेढलेला असतो, त्याप्रमाणे या काम-क्रोधाने आत्मज्ञान झाकले गेले आहे.
जैसी चंदनाची मुळी । गिंवसोनी घेपे व्याळीं ।
ना तरी उल्बाची खोळी । गर्भस्थासी ॥ २६० ॥
ज्याप्रमाणे चंदनाच्या मुळाला साप वेढून राहतात, किंवा गर्भातील लहान बाळ गर्भाशयाच्या पिशवीने वेढलेले असते,
कां प्रभावीण भानु । धूमेंवीण हुताशनु ।
जैसा दर्पण मळहीनु । कहींच नसे ॥ २६१ ॥
किंवा प्रकाशाशिवाय सूर्य, धुराशिवाय अग्नी आणि मळाशिवाय आरसा जसा कुठेही आढळत नाही,
तैसें इहीविण एकलें । आम्हीं ज्ञान नाही देखिलें ।
जैसें कोंडेनि पां गुंतलें । बीज निपजे ॥ २६२ ॥
त्याप्रमाणे या काम-क्रोधाशिवाय असणारे शुद्ध ज्ञान आम्ही कधी पाहिले नाही; जसे धान्याचे बीज नेहमी सालाने वेढलेलेच जन्माला येते.
आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा ।
कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणतलेन च ॥ ३९ ॥
हे कुंतीपुत्रा (अर्जुना), ज्ञानी पुरुषाच्या या निरंतर शत्रू असलेल्या आणि कधीही न तृप्त होणाऱ्या कामरूपी अग्नीने माणसाचे ज्ञान झाकले गेले आहे.
तैसें ज्ञान तरी शुद्ध । परी इहीं असे प्ररुद्ध ।
म्हणोनि तें अगाध । होऊनि ठेलें ॥ २६३ ॥
त्याप्रमाणे आत्मज्ञान जरी मूळचे शुद्ध असले, तरी या काम-क्रोधाने ते झाकून टाकले आहे; म्हणूनच ते सामान्य माणसाला समजण्यास कठीण झाले आहे.
आधी यांते जिणावें । मग तें ज्ञान पावावें ।
तंव पराभवो न संभवे । रागद्वेषां ॥ २६४ ॥
आधी या शत्रूंना जिंकावे लागते आणि मगच आत्मज्ञान प्राप्त होते; परंतु तोपर्यंत राग आणि द्वेष यांचा पराभव करणे सहज शक्य नसते.
यांते साधावयालागीं । जें बळ जाणिजे अंगी ।
तें इंधन जैसें आगी । सावावो होय ॥ २६५ ॥
कारण यांना जिंकण्यासाठी आपण जे जे प्रयत्न किंवा उपाय करतो, ते सर्व उपाय अग्नीमध्ये लाकूड टाकल्याप्रमाणे त्यांना अधिकच बलवान बनवतात.
इंद्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते ।
एतैरविमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम् ॥ ४० ॥
इंद्रिये, मन आणि बुद्धी हे या काम-क्रोधाचे मुख्य निवासस्थान म्हटले जाते; यांच्या आधारेच हा काम-क्रोध मनुष्याच्या ज्ञानाला झाकून त्याला मोहित करतो.
तैसे उपाय कीजती जे जे । ते यांसीचि होती विरजे ।
म्हणोनि हटियांते जिणिजे । इहींचि जगीं ॥ २६६ ॥
म्हणून जे जे उपाय केले जातात, ते त्यांनाच पूरक ठरतात; म्हणूनच या अत्यंत हट्टी शत्रूंना जिंकणे या जगात सर्वांत कठीण काम आहे.
ऐसियांही सांकडां बोला । एक उपायो आहे भला ।
तो करितां जरी आंगवला । तरी सांगेन तुज ॥ २६७ ॥
अशा या अत्यंत कठीण प्रसंगातही एक उत्तम उपाय आहे; जर तो तू आचरणात आणू शकलास, तर मी तुला तो सांगतो.
तस्मात् त्वमिंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ ।
पाप्मानं प्रहि ह्येनं ज्ञान्विज्ञाननाशनम् ॥ ४१ ॥
म्हणूनच, हे भरतश्रेष्ठा, तू सर्वात आधी आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेव आणि ज्ञान व विज्ञानाचा नाश करणाऱ्या या पापी काम-क्रोधाला नष्ट कर.
यांचा पहिला कुरुठा इंद्रियें । एथूनि प्रवृत्ति कर्मातें वियें ।
आधी निर्दळूनि घालीं तियें । सर्वथैव ॥ २६८ ॥
या काम-क्रोधाचे मुख्य ठाणे म्हणजे आपली इंद्रिये आहेत; इथूनच वाईट कर्मांची प्रवृत्ती जन्माला येते, म्हणूनच तू आधी या इंद्रियांना पूर्णपणे ताब्यात ठेव.
इंद्रियाणि पराण्याहुरिंद्रियेभ्यः परं मनः ।
मनसस्तु परा बुद्धियोर् बुद्धेः परतस्तु सः ॥ ४२ ॥
इंद्रिये ही शरीरापेक्षा श्रेष्ठ आहेत, इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे आणि जो बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे, तोच आत्मा आहे.
मग मनाची धांव पारुषेल । आणि बुद्धीची सोडवण होईल ।
इतुकेनि थारा मोडेल । या पापियांचा ॥ २६९ ॥
जेव्हा इंद्रिये ताब्यात येतील, तेव्हा मनाची धाव आपोआप थांबेल, बुद्धीची सुटका होईल आणि एवढ्याने या पापी शत्रूंचा पायाच उखडून जाईल.
एवं बुद्धे परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना ।
जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम् ॥ ४३ ॥
अशा प्रकारे बुद्धीपेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या आत्म्याला जाणून, स्वतःच्या मनाला बुद्धीच्या साहाय्याने स्थिर कर आणि हे महाबाहो, या जिंकण्यास कठीण असलेल्या कामरूपी शत्रूला ठार कर.
हें अंतरीहूनि जरी फिटले । तरी निभ्रांत जाण निवटले ।
जैसें रश्मीवीण उरले । मृगजळ नाही ॥ २७० ॥
जर हे शत्रू मनाच्या आतूनच नष्ट झाले, तर ते कायमचे संपले असे समज; जसे सूर्याच्या किरणांशिवाय मृगजळाला काहीही अस्तित्व उरत नाही,
तैसे रागद्वेष जरी निमाले । तरी ब्रह्मीचें स्वराज्य आलें ।
मग तो भोगी सुख आपुलें । आपणचि ॥ २७१ ॥
त्याप्रमाणे मनातील राग-द्वेष नष्ट झाले की माणसाला आत्मसाम्राज्याची प्राप्ती होते; आणि मग तो स्वतःच स्वतःच्या आत्मसुखाचा उपभोग घेतो.
जे गुरुशिष्यांची गोठी । पदपिंडाची गांठी ।
तेथ स्थिर राहोनि नुठीं । कवणे काळीं ॥ २७२ ॥
जिथे गुरू आणि शिष्याचा संवाद संपतो आणि जीवाचे शिवाशी ऐक्य होते, अशा परम पदावर स्थिर झाल्यावर मनुष्य कधीही ढळत नाही.
ऐसें सकळ सिद्धांचा रावो । देवी लक्ष्मीyeचा नाहो ।
राया ऐक देवदेवो । बोलता जाहला ॥ २७३ ॥
सर्व सिद्धांचे स्वामी आणि लक्ष्मीपती असणारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला असे सांगते झाले, हे राजा धृतराष्ट्रा, ऐक.
आतां पुनरपि तो अनंतु । आद्य एकी मातु ।
सांगेल तेथ पंडुसुतु । प्रश्नु करील ॥ २७४ ॥
आता पुन्हा तो अनंत देव एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, त्यावर पांडुपुत्र अर्जुन एक प्रश्न विचारणार आहे.
तया बोलाचा हन पाडु । का रसवृत्तीचा निवाडु ।
येणें श्रोतयां होईल सुरवाडु । श्रवणसुखाचा ॥ २७५ ॥
त्या संवादाचा गोडवा आणि रसाळपणा ऐकून सर्व श्रोत्यांना श्रवणसुखाचा उत्तम आनंद प्राप्त होईल.
ज्ञानदेवो म्हणे निवृत्तिचा । चांग उठावा करूनि उन्मेषाचा ।
मग संवादु श्रीहरिपार्थाचा । भोग बापा ॥ २७६ ॥
निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपल्या बुद्धीचा विकास करून, श्रीहरी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील या रसाळ संवादाचा आपण आस्वाद घेऊया.