॥ जय हरी विठ्ठल – श्री समर्थ धोंडूतात्या महाराज प्रसन्न ॥ संतवाणी डिजिटल लायब्ररी २०२६
🚩 प्रतिपंढरपूर - डोंगरशेळकी धाम

श्री समर्थ धोंडूतात्या महाराज महाचरित्र

भाग १६: थोडक्यात महत्त्वाचे (चरित्र गोषवारा) व श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांची आरती.

भाग १६: थोडक्यात महत्त्वाचे व पावन आरती


या भागात समाविष्ट मुख्य विषय:

  • थोडक्यात महत्त्वाचे... - श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांच्या संपूर्ण जीवनचरित्राचा कालक्रमानुसार गोषवारा.
  • श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांची आरती - सद्गुरूंच्या अलौकिक लीला व चरणांचे स्तवण करणारी पावन आरती.

थोडक्यात महत्त्वाचे...

(श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांचे जीवनचरित्र या ग्रंथातील प्रमुख विषयांचा गोषवारा...)

  • श्री समर्थ धोंडूतात्यांचा जन्म इ.स. १८३० मध्ये 'लोहा' येथे झाला.
  • श्री धोंडूतात्यांच्या वयाच्या आठव्या वर्षी तपस्वी "श्री सखाराम महाराज काशीकर" या श्रीगुरुसंतांची भेट. श्रीगुरु सान्निध्यात मौजीबंधन व वैदिक विद्येचा अभ्यास.
  • श्री धोंडूतात्यांचे वडील इ.स. १८४५ मध्ये स्वर्गवासी झाले. अर्थात तात्यांना त्यांच्या वयाच्या पंधराव्या वर्षी वडिलांचा वियोग घडला.
  • इ.स. १८४६ मध्ये विराळगावी आजोळी आले व तेथेच मामांच्या घरी दत्तक म्हणून राहिले. विराळगावी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात केली.
  • ईश्वरभक्तीसाठी नैष्ठिक ब्रह्मचारी राहण्याचा निर्धार. भक्ती, ज्ञान व वैराग्याने परिपूर्ण होऊन पारमार्थिक जीवन जगू लागले.
  • इ.स. १८६० मध्ये मातोश्री गंगाबाई स्वर्गवासी झाल्या. श्री तात्यांना त्यांच्या वयाच्या तिसाव्या वर्षी आईचा वियोग घडला.
  • श्री धोंडूतात्या महाराजांनी इ.स. १८५४ साली घोडे घेतले.
  • श्री तात्यांचे श्रीगुरु श्री सखाराम महाराज काशीकर हे तुळजापूर येथे आषाढ वद्य एकादशी शके १८०५ मध्ये समाधिस्थ झाले. श्री तात्यांनी आपल्या श्रीगुरूंचे जेथे देहावसान झाले तेथे समाधी बांधून पुढे पंढरपुरास जाऊन विठ्ठल दर्शन घेतले.
  • विराळच्या मठाच्या बांधकामाची इ.स. १८९४ मध्ये सुरुवात व इ.स. १९०२ मध्ये समाप्ती व त्या मठामध्ये संजीवन समाधीचा विचार करून समाधिस्थळ निर्माण केले.
  • इ.स. १९१८ मध्ये समाधिस्थळाच्या वरच्या बाजूस दत्तमूर्तीची प्रतिष्ठापना केली.
  • इ.स. १९०४ साली एका पांगळ्याला श्री धोंडूतात्यांनी आपले पाय दिले, तेव्हा तो पांगळा तीर्थयात्रेला गेला व आपण स्वतः (धोंडूतात्या) बसू पडले; अर्थात पुन्हा उठून उभे राहता आले नाही.
  • पुढील संपूर्ण काळ मेण्यात बसून प्रवास करत समाजाला व्यसनांपासून परावृत्त करून भक्तिमार्गाला लावण्याचे कार्य केले.
  • श्री धोंडूतात्यांचे इ.स. १९२७ मध्ये डोंगरशेळकीस आगमन झाले.
  • इ.स. १९२७ मध्ये डोंगरशेळकीस अखंड हरिनाम सप्ताह आणि डोंगरशेळकीस पाणी देण्याची कृपा केली व डोंगरशेळकी येथील सप्ताहामध्ये महाप्रसादाच्या दिवशी गगनात सूर्याला थांबवले.
  • इच्छामरणी संत असलेल्या श्री धोंडूतात्यांनी आपला प्रयाणकाळ सांगितला आणि इ.स. १९३२ साली (शके १८५४, चैत्र शुद्ध तृतीया) या दिवशी श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांनी डोंगरशेळकी येथे संजीवन समाधी घेऊन ब्रह्मस्वरूपामध्ये विलीन झाले.

आरती

श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांची

जय जय गुरुवर्य धुंडिराज माऊली ।
ज्ञानहिन दुर्बळांसी अससी साऊली ।।धृ।।

लोहा गांवी जन्म घेवोनि लीला दावीले ।
सखाराम गुरु पासोनि विद्या संग्रहिले ।।१।।

विराळग्रामी आगमन केले आजोळी ।
मठ बांधोनिया दत्त मूर्ति स्थापिली ।।२।।

ग्रामोग्रामा भेटी देवोनि पावन केले ।
एक प्रहर भास्करांसी गगनी रोधीले ।।३।।

दृढभाव मनी धरोनि भेटिसी येता ।
तत्कालचि पूर्ण करी भक्त मनोरथा ।।४।।

पांगळ्यासी पाय देवोनि तीर्था धाडीले ।
चैत्रशुध्द तृतीयेसी निजधामा गेले ।।५।।

संजीवन समाधी घेतली शेळकीग्रामासी ।
सद्भावे नवनाथ ठाव मागे चरणांसी ।।६।।

॥ श्री समर्थ धोंडूतात्या महाराज की जय ॥

❮ भाग १५ मागे अनुक्रमणिका संपूर्ण अनुक्रमणिका ➔

🚩 जय हरी विठ्ठल!

श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांची ही पावन कथा व महाआरती सर्व भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की शेअर करा.

॥ श्री समर्थ धोंडूतात्या महाराज प्रसन्न ॥