कई देखतां होईन डोळीं । सकळां भूतीं मूर्ति सांवळी । जीवा नांव भूमंडळीं । जळीं स्थळीं काष्ठीं पाषाणीं ॥१॥
ऐसा कृपा करीं नारायण । जीव जगाचा होईन । प्रेमसागरीं बुडईन । होईल स्नान अनुतापीं ॥ध्रु.॥
ऐसा कई येईन दैवास । दृश्य नासोनि जाईल आस । सदा संतचरणीं देहाचा वास । सेवीन शेष धणीवरी ॥२॥
कई नवसा यातील अंकुर । सुखा नाहींसा होईल पार । अमृत तें पृथ्वीजळ सागर । वाहाती पूर आनंदाचे ॥३॥
प्रसन्न दया क्षमा शांति । कई नवविधा होईल भक्ति । भोगीन वैराग्यसंपत्ति । मनोरथ कळती तई पुरले ॥४॥
तुकयाबंधु म्हणे सांग । नव्हे तुजविण निरसेना पांग । म्हणोनि घातलें साष्टांग । पांडुरंगा वरी चरणा ॥५॥
मला जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी आणि सर्व प्राणिमात्रांमध्ये ती देवाची सावळी मूर्ती कधी दिसेल? जेव्हा नारायण अशी कृपा करेल, तेव्हा मी प्रेमाच्या सागरात बुडून जाईन. सर्व आसक्ती नष्ट होईल आणि संतांच्या चरणी माझा वास होईल. कान्होबा म्हणतात, तुझ्याशिवाय माझे कोणतेही कोड पुरणार नाही, म्हणूनच मी तुझ्या चरणांवर साष्टांग प्रणिपात करतो.