पाहा किती आले शरण समान चि केले । नाहीं विचारिले गुण दोष कोणांचे ॥१॥
मज सेवटींसा द्यावा ठाव तयांचिये देवा । नाहीं करीत हेवा कांहीं थोरपणाचा ॥ध्रु.॥
नाहीं पाहिला आचार कुळगोत्रांचा विचार । फेडूं आला भार मग न म्हणे दगड ॥२॥
तुका म्हणे सर्वजाणा तुझ्या आल्यावरि मना । केला तो उगाणा घडल्या दोषांच्या ॥३॥
पहा, तुला जे जे शरण आले, त्या सर्वांना तू समान मानून उद्धार केलास, कोणाचेही गुण किंवा दोष विचारात घेतले नाहीत. हे देवा, त्या सर्व भक्तांच्या शेवटी तरी मला थोडी जागा दे, मी कसल्याही थोरपणाचा किंवा मोठेपणाचा मत्सर करत नाही. तू कोणाचा आचार किंवा कुळगोत्र पाहिले नाहीस, जो संसाराचा भार उतरवायला आला, त्याला तू दगड म्हणून नाकारले नाहीस. संत तुकाराम महाराज म्हणतात, हे सर्वज्ञ देवा, तुझ्या मनात आले की तू माणसाकडून घडलेल्या सर्व दोषांचा निवाडा करून त्याला पावन करतोस.