न राहे क्षण एक वैकुंठीं । क्षीरसागरीं त्रिपुटी ।
जाय तेथें दाटी । वैष्णवांची धांवोनि ॥१॥
भाविक गे माये भोळें गुणाचें । आवडे तयाचें नाम घेतां तयासी ॥ध्रु.॥
जो नातुडे कवणिये परी । तपें दानें व्रतें थोरी ।
म्हणतां वाचे हरि । राम कृष्ण गोविंदा ॥२॥
चौदा भुवनें जया पोटीं । तो राहे भक्तांचिये कंठीं ।
करूनियां साटी। चत्ति प्रेम दोहींची ॥३॥
जया रूप ना आकार । धरी नाना अवतार ।
घेतलीं हजार । नांवें ठेवूनि आपणां ॥४॥
ऐसा भक्तांचा ॠणी । पाहातां आगमीं पुराणीं ।
नाहीं तुका म्हणे ध्यानीं । तो कीर्तनीं नाचतसे ॥५॥
देव वैकुंठात किंवा क्षीरसागरात एक क्षणही राहत नाही; जिथे वैष्णव भक्तांची दाटी असते तिथे तो धावत जातो. भाबड्या आणि निष्पाप भक्तांचे नाव घेणे देवाला आवडते. जो मोठे तप, दान किंवा व्रताने सापडत नाही, तो केवळ 'हरी, राम, कृष्ण, गोविंदा' नामस्मरण केल्याने प्रसन्न होतो. ज्याच्या पोटात चौदा भुवने आहेत, तो भक्तांच्या प्रेमासाठी त्यांच्या कंठात वास करतो. तुकाराम महाराज म्हणतात की जो ध्यानधारणेतही सापडत नाही, असा देव भक्तांच्या कीर्तनात आनंदाने नाचत असतो.