भूतदयापरत्वें जया तया परी । संत नमस्कारीं सर्वभावें ॥१॥
शिकल्या बोलाचा धरीसील ताठा । तरी जासी वाटा यमपंथें ॥ध्रु.॥
हिरा परिस मोहरा आणीक पाषाण । नव्हे परी जन संतां तैसी ॥२॥
सरितां वाहाळां गंगे सागरा समान । लेखी तयाहून अधम नाहीं ॥३॥
आणीक अमुप होती तारांगणें । रविशशिमानें लेखूं नये ॥४॥
तुका म्हणे नाहीं नरमता अंगीं । नव्हे तें फिरंगी कठिण लोह ॥५॥
प्राणिमात्रांवर दया बाळगून संतांना सर्वभावाने नमस्कार करावा. जर शिकलेल्या ज्ञानाचा अहंकार धरशील, तर सरळ यमाच्या मार्गाने जाशील. हिरा, परिस, मणी आणि सामान्य दगड जसे एकसारखे नसतात, तसेच सर्वसामान्य लोक आणि संत हे समान नसतात. ओढे, नद्या यांना गंगा आणि समुद्राच्या बरोबरीचे मानणारा मनुष्य अत्यंत अधम होय. आकाशात असंख्य तारे असतात, पण त्यांची तुलना सूर्य आणि चंद्राशी करता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात की, ज्याच्या अंगात नम्रता नाही, तो तलवारीच्या कठीण लोखंडासारखा कठोर असतो, तो संत होऊ शकत नाही.