चोखियाचे घरी नवल वर्तले । पाहुणे ते आलें देवराव ॥१॥
सोयर निर्मळा होत्या दोघी घरी । पाहुणा श्रीहरी आला तेव्हां ॥२॥
खोपट मोडकें द्वारी वृदांवन । बैसे नारायण तया ठायीं ॥३॥
दोघी प्रेमभरित धरिती चरण । घालितीं लोटांगण जीवेभावें ॥४॥
कोठोनियां स्वामी आलेती तें सांगा । यावर येरू म्हणे पै गा दूर देशीं ॥५॥
झाले दोन प्रहर क्षुधेने पीडिलों । म्हणोनियां आलों तुमचे सदनी ॥६॥
कोणाचें हें घर सांगा हो निर्धार । ते म्हणती महार आम्ही असों ॥७॥
येरू म्हणें घरी कोण अधिकारी । कैसी चाले परी संसाराची ॥८॥
मग त्या ऐकोनी तयाचे बोलणें । म्हणती देवाजीनें निकें केलें ॥९॥
बंका म्हणे ऐसा कृपाळु श्रीहरी । चोखियाचे घरी राहे सुखें ॥१०॥
तिकडे चोखामेळा यांच्या घरी एक नवल घडले; स्वतः देवराव (विठ्ठल) पाहुणे म्हणून आले. सोयरा आणि निर्मळा दोघीही घरात होत्या, तेव्हा श्रीहरी तिथे प्रकट झाला. त्यांचे घर मोडके-तोडके झोपडे होते आणि दारात वृंदावन होते, तिथे नारायण येऊन बसला. त्या दोघींनी प्रेमभराने देवाचे चरण धरले आणि लोटांगण घातले. त्यांनी विचारले, "स्वामी, तुम्ही कुठून आलात?" देव म्हणाला, "मी दूर देशातून आलो आहे. दुपार झाली आहे आणि मी भुकेने व्याकुळ झालो आहे, म्हणून तुमच्या घरी आलो. हे घर कोणाचे आहे?" त्यांनी सांगितले, "आम्ही जातीचे महार आहोत." देवामने विचारले, "घराचा मालक कोण आहे आणि तुमचा संसार कसा चालतो?" त्याचे ते बोलणे ऐकून त्या म्हणाल, "देवाच्या कृपेने सर्व काही ठीक चालले आहे." बंका म्हणतात, असा हा कृपाळू श्रीहरी चोखामेळा यांच्या घरी सुखाने राहू लागला.