वाराणसी यात्रे जाईन । प्रयाग तीर्थ पाहीन । त्रिवेणीय स्नान करीन । परी मी वीट नव्हेन ॥१॥
विठोबा पायींची वीट । मी कई बा होईन ॥२॥
गोदावरी यात्रे जाईन । बारा वरुषाचें फ़ळ लाहीन । अब्जक तीर्थी स्नान करीन । परी मी वीट नव्हेन ॥३॥
मल्लिकार्जुन यात्रे जाईन । श्रीशैल्य शिखर पाहीन । पाताळगंगे स्नान करीन । परी मी वीट नव्हेन ॥४॥
मातापुर यात्रे जाईन । सह्याद्री पर्वत पाहीन । गहनगंगे स्नान करीन । परी मी वीट नव्हेन ॥५॥
कोल्हापुरीं यात्रे जाईन । महालक्ष्मी पाहीन । विशाळ तीर्थी स्नान करीन । परी मी वीट नव्हेन ॥६॥
एका अंगुष्ठीं तप करीन । पृथ्वी पात्रचि लाहीन । देह कर्वतीं देईन । परी मी वीट नव्हेन ॥७॥
बहुता पुण्याच्या सायासीं । चरण जोडले विटेसी । निवृत्तिदासु म्हणे परियेसी । परी मी वीट नव्हेन ॥८॥
मी काशी, प्रयाग, गोदावरी, श्रीशैल्य, माहूर, कोल्हापूर अशा सर्व तीर्थयात्रा करीन किंवा कडक तपश्चर्या करीन, पण तरीही मला विठ्ठलाच्या पायांखाली असणाऱ्या त्या धन्य विटेची पायरी गाठता येणार नाही. पांडुरंगाच्या चरणांना स्पर्श करणाऱ्या त्या विटेचे भाग्य मला कधी लाभेल का, असा विचार निवृत्तीनाथ महाराजांचे शिष्य ज्ञानेश्वर करतात.